इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगेला महापूर | पुढारी

इसापूर धरणातून पाणी सोडल्याने पैनगंगेला महापूर

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : परिसरात झालेला मुसळधार पाऊस व इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पावसाची आवक झाल्याने धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आली. यामुळे पैनगंगेला महापूर येवून अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे.

परिणामी, नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील विदर्भ – मराठवाड्याला जोडणाऱ्या मार्लेगाव पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने बुधवारी (दि, २९) साकाळी ६ वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली आहे.

त्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून काठावरच्या शेतात शिरल्याने हजारों हेक्टरमधील पिके उद्धवस्त झाली आहेत.

मागील तीन दिवसांपूर्वी इसापूर धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. त्यापेकी धरणाची १० दरवाजे एक मीटरने तर ३ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आली असून त्यामधून ४८ हजार २०४ क्युसेक्स इतक्या विसर्गाने पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे उपअभियंता हनुमंत धुळगंडे यांनी दिली.

इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने पैनगंगेला महापूर आला आहे. या पुराचे पाणी नदीचे पात्र सोडून शेत शिवारात घुसले. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील दोन्ही तिराच्या उमरखेड, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, महागाव या तालुक्यातील एकंदरीत हजारों हेक्टरमधील पिकांना बसला.

परिणामी, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास  हिरावल्या गेला. सोयाबीनसह ऊस, कापूस आदी पिके उद्धवस्त झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

उद्भभवलेल्या परिस्थितीला इसापूर धरण व्यवस्थापनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप करीत पिके उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.

धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन न करता धरण संपूर्ण भरण्याची वाट पाहून आकस्मिकतरित्या एकाच वेळी धरणाची १३ दरवाजे उघडून पाण्याचा मोठया प्रमाणात विसर्ग करण्यात आला, अशी संतप्त प्रतिक्रिया युवा शेतकरी शाम धात्रक (चातारी) यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

 

 

Back to top button