

पुढारी वृत्तसेवा:अमरावती; पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. अमरावती विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या उर्ध्व (अप्पर) वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले आहेत. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बुधवारी (दि.८ ) मुसळधार पाऊस झाल्याने प्रकल्प ९९ टक्के भरला आहे.
४५३ क्युसेकने पाणी येत असल्यामुळे रात्री ८.०० वाजता प्रकल्पाचे एकूण ७ दरवाजे ३५ सेमीने उघडण्यात आले होते. मात्र, गुरुवारी
( दि.९ ) सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी ५ दरवाजे ११० से.मी. ने उघडण्यात आले.
प्रकल्पातून ४०० मी प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सावधगिरी बाळगण्याबाबत आवाहन कार्यकारी अभियंता उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती यांनी केले आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडले आहेत.
जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. बुधवारी देखील शहरासह जिल्ह्याला दुपारी ३ वाजेपासून पावसाने चांगली हजेरी लावली. शहरात झालेल्या पावसामुळे नाले भरुन वाहू लागले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनांमध्ये पाणी जाऊन ते बंद पडले. जिल्ह्यात अमरावती, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार या ठिकाणी पाऊस झाला. पावसामुळे नदी- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
हेही वाचलं का?