

नागपूर पुढारी वृत्तसेवा : गेले कित्येक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने विदर्भ मध्ये पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. काही दिवसांपासून संपुर्ण विदर्भात पावसाने दडी मारली होती. मात्र आता वरुणराजाने विदर्भातील जनतेला दिलासा दिलाय. नागपूर जिल्ह्यात आणि शहरात बुधवारी आणि गुरूवारी दिवसभर बरसलेल्या संततधार पावसाने नागपूरकर सुखावले आहेत.
विदर्भ मध्ये सध्या मॉन्सून सक्रिय असून, आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. नागपुरात गुरूवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कधी रिमझिम तर कधी धो-धो पाऊस कोसळला. संततधार पावसामुळे रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते.
अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. पावसामुळे नागपूरकरांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. नरेंद्रनगर पुलाखाली नेहमीप्रमाणे गुडघ्यापर्यंत पाणी जमा झाल्याने पाण्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या तक्रारी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे आल्या. पावसामुळे कमाल तापमानातही चार अंशांची घट होऊन पारा २६ अंशांवर आला. नागपूर विभागात सायंकाळी साडेपाचपर्यंत चोविस तासात ३२.३ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. तर नागपूर विभागात सर्वाधिक १५६ मिमि पाऊस वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प क्षेत्रात पडला आहे.
विभागात सर्वाधिक पाऊस चंद्रपूर ४७.६मिमी, नागपूर ४१.८मिमी, भंडारा ३८.९मिमी, वर्धा २६.५मिमी, गडचिरोली १९.४मिमी, आणि गोंदिया १०.४मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई आणि डोंगरगाव हे जलसिंचन प्रकल्प १०० टक्के भरले आहे.
हवामान विभागाने गुरुवारी व शुक्रवारी नागपूरसह विदर्भात 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असल्याने पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात सगळीकडेच दमदार पाऊस बरसल्याचे वृत्त आहे. आजच्या पावसामुळे कोमेजलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने बळीराजाही खुश आहे. या पावसाचा सर्वाधिक फायदा पूर्व विभागातील धनपट्ट्याला होणार आहे.