मोदी सरकार हटवल्याशिवाय देशातील महागाई दूर होणार नाही : शरद पवार | पुढारी

मोदी सरकार हटवल्याशिवाय देशातील महागाई दूर होणार नाही : शरद पवार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : देशातील महागाई दूर करण्यासाठी मोदी सरकार सत्तेवरून खाली उतरले पाहिजे त्याशिवाय सामान्य माणसाला सोयीस्कर जीवन जगता येणार नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी तुळजापूर येथील जाहीर सभेत केले.

जुन्या बसस्थानकाच्या रस्त्यावर संपन्न झालेल्या या जाहीर सभेमध्ये व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार राहुल मोटे, अशोक जगदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, मुकुंद डोंगरे ,शामलताई वडणे, प्रतापसिंह पाटील रामचंद्र आलोरे जीवनराव गोरे स्मिता शहापूरकर कमलाकर घोडके राजा शेरखाने शफी शेख ऋषिकेश मगर अमोल कुतवळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने सभेला सुमारे आठ ते दहा हजार लोकांची उपस्थिती होती. प्रारंभी अशोक जगदाळे यांनी ही लोकसभा निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असे सांगितले. माजी आमदार राहुल मोटे यांनी ओमराजे निंबाळकर दोन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होतील असे सांगितले. आम आदमी प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांनी मोदी सरकारने सामान्य माणसाचे जीवन जगणे अत्यंत कठीण केले आहे ही निवडणूक मोदी लाटविरोधी आहे असे सांगितले.

या निमित्ताने उपस्थित सभेला मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आपण यापूर्वी धाराशिव जिल्ह्याच्या सुधारण्यासाठी डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांना राजकारणामध्ये संधी दिली परंतु आज ओम राजे निंबाळकर यांचे भाषण ऐकल्यानंतर मला धक्का बसला आहे असे विधान केले. धाराशिव चे मेडिकल कॉलेज नेरुळ येथे नेणे चुकीचे असल्याचे टिप्पणी माजी केंद्रीय मंत्री पवार यांनी करून सत्तेचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या निवडणूक उमेदवारांना देखील तपास यंत्रणांच्या नोटीसहाय्यता आहेत ही बाब सत्तेचा गैरवापर करणारी आहे असे सांगून कितीही संकट आली तरी जनतेची साथ न सोडणाऱ्या खासदार ओमराजे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे याची झळ सामान्य माणसाला होते आहे 2014 मध्ये पेट्रोलचा दर 71 रुपये होता तो आज 106 रुपये आहे गॅसचा दर 403 रुपये वरून अकराशे 67 रुपये झाला आहे अशी उदाहरणे त्यांनी आपल्या भाषणात दिली बेरोजगारी खूप मोठ्या संख्येने वाढली असून 84 टक्के बेरोजगार भारतामध्ये दिसून येत आहेत असा अहवाल एका अभ्यास यंत्रणेने दिला आहे असे देखील सांगून मोदी सरकारचा कारभार देशावर संकट आणणारा आहे त्यामुळे सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला दूर करा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या सभेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांचा खरपूस समाचार घेतला महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील आणि मल्हार पाटील यांनी केलेल्या विधानाची खिल्ली उडवून हे लोक स्वार्थी राजकारणी आहेत एकाच घरामध्ये वेगवेगळे पक्ष ठेवून समाजाचे हित साधले जाऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे सांगून आपण जनतेच्या प्रश्नासाठी मागील पाच वर्ष खूप कष्ट केले आहेत या कष्टाची पावती या निवडणुकीच्या मतदारांमधून मला देण्यात यावी आणि पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.

व्यासपीठावर बसलेले शरद पवार यांच्याकडे लक्ष केंद्रित करून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की आपण ज्यांना चाळीस वर्ष सत्ता दिली ते डॉक्टर पद्मश्री पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील एका रात्रीमध्ये दुसऱ्या पक्षाचे झालेले आहेत. त्यांना अमर्याद सत्ता देऊन देखील धाराशिव जिल्हा आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत देशात तिसऱ्या स्थानी आहे आणि श्रीमंत खासदारांच्या यादीत डॉक्टर पद्मश्री पाटील वरच्या स्थानी आहेत यावरून डॉक्टर पद्मश्री पाटील यांची ही कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे अशा शब्दात टीका केली. आमदार कैलास पाटील यांनी 50 खोकला लाथ मारून आपली निष्ठा सिद्ध केली आहे असे सांगून कोरोनाच्या काळात आपण जिथे कोरोनाची लागण झाली त्या प्रत्येक गावात पोहोचलो आणि मदत कार्य केले असे देखील याप्रसंगी खासदार ओम राजे यांनी सांगितले. मकरंद राजे निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे नेते श्याम पवार, कमलाकर चव्हाण, काँग्रेसचे नेते अमर मगर, ऋषिकेश मगर, राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील पाटील, शरद जगदाळे यांनी सभास्थानी व्यवस्थापन केले. पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त या सभेला ठेवण्यात आला होता. सभेमध्ये लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा मोठ्या घोषणा देण्यात आल्या या सभेमध्ये यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला हलगीवाला महादेव कांबळे याचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Back to top button