सांगली :सांगलीत 30 टक्के कर्मचारी कामावर

सांगली :सांगलीत 30 टक्के कर्मचारी कामावर
Published on
Updated on

राज्य सरकारने एस.टी. कर्मचार्‍यांना पगारवाढ जाहीर केल्याने 25 ते 30 टक्के कर्मचारी गुरुवारी कामावर हजर झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पाच हजारपैकी सातशे कर्मचार्‍यांनी काम सुरू केले. मात्र, काही कर्मचारी मात्र संपावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे एस.टी. कर्मचार्‍यांत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, येथील बसस्थानकातून जिल्ह्यांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी बसवाहतूक सुरू झाली आहे.

दिवसभरात 162 बस धावल्या. त्याशिवाय बसस्थानकातून वडाप वाहतूकही सुरू आहे.जिल्ह्यात गेल्या 19 दिवसांपासून सुरू असणारा एस. टी. संप बुधवारी राज्य सरकारच्या पगारवाढीच्या घोषणेमुळे मागे घेतला जाईल, असे वाटत होते. मात्र, काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर अद्यापही ठाम आहेत.

आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर सायंकाळपर्यंत 30 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. उद्यापासून आणखी काही कर्मचारी कामावर हजर होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे

जिल्ह्यात गुरुवारी दुपारपर्यंत 98 एस. टी. बस धावल्या. त्या तालुक्याच्या ठिकाणी जात आहेत. त्याशिवाय पुण्यासाठी शिवशाही खासगी बस वाहतूकही सुरू आहे. मात्र, परजिल्ह्यात होणारी बस वाहतूक अद्याप बंद आहे.

बसस्थानकांतून वडाप, रिक्षा अशी खासगी वाहतूकही दिवसभर सुरू होती. कामावर न येणार्‍या 284 जणांचे आत्तापर्यंत निलंबन करण्यात आले आहे. 50 जणांची सेवासमाप्त केली आहे. इतर काही कर्मचार्‍यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

सरकारला पगारवाढ देणे भाग पडले आमदार खोत म्हणाले, संघटनाविरहित जे कामगार होते, त्यांच्या लढ्याचे हे यश आहे. आंदोलनामुळे सरकारला पगारवाढ देणे भाग पडले. देशातील ही पहिलीच घटना आहे. एस.टी. ही राज्याची रक्तवाहिनी आहे. ती टिकली पाहिजे. विलिकरणाच्या मागणीसाठी आमचा लढा सुरूच राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news