सांगली जिल्हा बँक निवडणूक : प्रकाश जमदाडे-विक्रम सावंत यांच्यात चुरस | पुढारी

सांगली जिल्हा बँक निवडणूक : प्रकाश जमदाडे-विक्रम सावंत यांच्यात चुरस

सांगली; पुढारी वृत्तसेवा

जत तालुक्यात सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनेल मधून माजी सभापती तथा रेल्वे बोर्डाचे सदस्य प्रकाश जमदाडे व महाविकास आघाडी प्रणित सहकार विकास पॅनेलचे उमेदवार आमदार विक्रम सावंत यांच्यातील लढतीकडे जिल्ह्याचे सर्वाधिक लक्ष लागून राहिले आहे. (सांगली जिल्हा बँक निवडणूक)

माजी आमदार विलासराव जगताप यांनी शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार निवडून यावे यासाठी व्यूहरचना आखली आहे. काँग्रेस व महाविकास आघाडीतील अंतर्गत नाराजीचा फटका आमदार सावंत यांना बसू शकतो. यामुळे माजी सभापती प्रकाश जमदाडे हे निवडणुकीत बाजी मारणार अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे. यामुळे हायहोल्टेज लढत लक्षवेधी बनली आहे.

जत तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. संस्था गटातून शेतकरी विकास मधून मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे आणि सहकार विकास पॅनेलमधून आमदार विक्रम सावंत यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. या लढतीत माजी आमदार विलासराव जगताप, तालुक्यातील काही मातब्बर नेत्यांनी छुप्या पद्धतीने प्रकाश जमदाडे यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

सहकार संस्था गटातून तालुक्यातून ८५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विजयाचा जादुई आकडा गाठण्यासाठी जमदाडे व सावंत यांच्यात कसोटी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता ते जनसामान्यांसाठी कार्यरत राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळोवेळी सहभागी होऊन प्रलंबित प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका प्रकाश जमदाडे यांनी नेहमीच निभावली आहे.

दुसरीकडे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी धुरा असलेले आमदार विक्रम सावंत यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत अंतर्गत सत्तासंघर्ष कलहाचा परिणाम बँकेच्या निकालावर होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीतील नाराज मतदारांचा जमदाडे यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची वाटचाल विजयाकडे असल्याचे दिसून येते. जमदाडे यांनादेखील राजकीय घडामोडीकडे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.

आमदार सावंत यांना विरोधकांनी मोट बांधल्याने विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देखील कसल्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकावी लागणार असल्याचे सांगितले आहे. सहकार विकास पॅनेल प्रचार सभेत मंत्री कदम यांनी साम दाम दंड चा वापर करू असे सूतोवाच केले होते.

यावर माजी आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेत सहकार विकास पॅनेलचा उमेदवाराचा विजय निश्चित असल्याने मंत्री कदम यांना अशी भाषा करावी लागत आहेत असा आरोप केला आहे. यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप मुळे निवडणुकीमध्ये रंगत आली आहे.

याचबरोबर इतर मागासवर्गीय गटात माजी सभापती तम्मणगौडा रवी पाटील व माजी सभापती मन्सूर खतीब यांच्या लढती कडे लक्ष लागले आहे. या गटातील उमेदवारांना जिल्ह्यातील दोन हजार २१९ मतदारांचे मतदान आहे. दोन्ही गटातील उमेदवारांनी मतदारांपर्यंत प्रत्यक्षात भेटीगाठीद्वारे व आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.

संस्था गटात मोजकेच मतदार असल्याने बहुतांशी मतदार दोन्ही उमेदवारांनी सहलीवर पाठवले आहेत. संस्था गटातील उमेदवार यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. जत तालुक्यात शिवानु भव मंडप येथे जिल्हा परिषद शाळेत तालुक्यातील सर्व मतदार रविवारी आपला हक्क बजावणार आहेत. निवडणूक शाखेने सर्व तयारी केली आहे. मतदाराची पळवापळवी सुरू असल्याचे चित्र आहे.

Back to top button