पुणे, पुढारी वृत्तसेवा: रेल्वेतून प्रवास करताना मिळणारे गरमागरम अन्न प्रवाशांना आता मिळणार नाही. रेल्वे प्रशासनाने आग लागण्याच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व गाड्यांमध्ये असलेल्या पॅन्ट्री कारमधील गॅस सिलिंडर हटविण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे 'कही खुशी कही गम' असे वातावरण रेल्वेच्या वर्तुळात पाहायला मिळत आहे.
प्रवाशांना रेल्वेमध्ये गरमागरम अन्न देण्याचा ठेका रेल्वेकडून खासगी ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र, रेल्वेत जेवण तयार करताना यापूर्वी अनेकदा आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. मात्र, ठेकेदारांमध्ये या निर्णयामुळे नाराजी निर्माण झाली आहे.
रेल्वेतील गॅस सिलिंडर प्रशासनाने हटविण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत काही प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असल्याचे प्रवाशांनी सांगितले. या संदर्भात रेल्वेला विचारले असता, प्रत्येक स्थानकावर गाडीत प्रवाशांना गरमागरम जेवण मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेत जेवण बनविण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गाडीमध्ये गरमागरम जेवण पुरविले जाईल, प्रवाशांनी याबाबत चिंता करू नये.
– मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग
हेही वाचा