

निरा डावा कालव्याच्या आवर्तनाने शेतकरी सुखावला!
जूनपर्यंत पाणी सुरू ठेवण्याची मागणी
बारामती : उन्हाळ्याची तीवता वाढत असली तरी निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने बारामती तालुक्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेले कालव्याचे आवर्तन जूनपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजनातून जिथे कालव्यातून अधिकच्या पाण्याची गळती होत होती. त्या ठिकाणी अस्तरीकरण झाल्याने पाणीगळती कमी होत आहे. पर्यायाने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पुरेसा पाणीपुरवठा होत आहे, शिवाय कालवा अतिशय स्वच्छ झाला आहे.
बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील काही भागांना वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन गेल्या 3 महिन्यांपासून सुरळीतपणे सुरू आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळबागा बहरल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
निरा धरणसाखळीत सध्या 75 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वीर धरणातून आवर्तन सुरू असल्याने बारामती आणि इंदापूर तालुका उन्हाळ्यात हिरवागार आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यांतील छत्रपती, माळेगाव आणि सोमेश्वर या कारखान्यांसह परिसरातील ऊसतोडणी मजुरांनाही जनावरांसाठी, वापरासाठी कालव्याच्या पाण्याचा उपयोग होत आहे.
बारामती, इंदापूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र मोठे आहे. कायमस्वरूपी आणि हक्काचे पाणी मिळत असल्याने उसासह तरकारी पिकांचे मोठे
उत्पन्न या ठिकाणी घेतले जाते. मुबलक पाणी असल्याने शेतीतील उत्पन्न वाढले असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. पालेभाज्या, फळबागा, उसासह शेतात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत.
शेतकऱ्यांना निरा नदी आणि डावा कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा होत आहे. डावा कालव्याला पाणी असल्याने विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत होणार आहे. तसेच छोटे उद्योगधंदे, मत्स्यपालन यांनाही याचा उपयोग होत आहे. फेबुवारी ते मे या 3 महिन्यांच्या कालावधीत कालवा पूर्णक्षमतेने सुरू राहिल्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नदीच्या धरणसाखळीतील गुंजवणी, भाटघर, निरा-देवघर व वीर धरणाचा मोठा आधार आहे. याच धरणातील पाण्यावर या भागात शेती उत्पादनात क्रांती झाली आहे.
डिंभे धरणातून उजवा कालव्याला पाणी
आंबेगाव-शिरूरमधील 45 गावांना दिलासा
मंचर : हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)च्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांमधील रब्बी हंगामातील शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ पावसाअभावी आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पाणी जीवनदायी ठरणार आहे.
उजवा कालव्यातील पाण्याचा लाभ प्रामुख्याने ऊस, गहू, बटाटा, कांदा आदी पिकांना होणार असून, उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील पिके सध्या वाढीच्या टप्प्यात असताना पाण्याची अत्यंत गरज होती. याबाबतची मागणी पंचायत समितीच्या सदस्या अंकिता अनिल वाळुंज यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याची सूचना जलसंपदा विभागाला केली होती. त्यानुसार उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
उजव्या कालव्यातून पाणी मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होणार आहे. शेतीपिकांसोबतच जनावरांसाठी हिरव्या चार्याच्या पिकाला या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पशुपालकांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार असल्याने ग््राामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय योग्य वेळी झाल्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन व वाटप व्हावे, अशी अपेक्षा लाभार्थी गावांमधून व्यक्त होत आहे.
मच्छिंद्र गावडे, संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना
डिंभे धरणातून उजवा कालव्याला पाणी मिळाल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. ऊस, कांदा, गहू यांच्यासह जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
अरविंद वळसे पाटील, भाजप नेते, आंबेगाव तालुका
घोड शाखेला पाणी सोडले
रब्बी हंगामातील पिकांना फायदा
पारगाव : डिंभे धरणाच्या डावा कालव्याच्या घोड शाखेला जलसंपदा विभागाने पाण्याचे आवर्तन सोडले आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दिलासा मिळाला आहे. रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा मोठा फायदा होत असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात लौकी, जाधववाडी, थोरांदळे, खडकी, भराडी, जवळे यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी घटल्याने गहू, हरभरा, कांदा यांसारखी रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जलसंपदा विभागाने वेळेवर पाण्याचे आवर्तन सोडल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
घोड शाखेच्या कालव्यालगत असलेल्या गावांतील शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या शेतात पाणी वळवून पिकांना पाणी दिले. सध्या गव्हाचे पीक अंतिम टप्प्याच्या अवस्थेत असून, हरभऱ्याला शेंगा लागण्याचा टप्पा आहे. या अवस्थेत मिळालेले पाणी उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाल्यास उन्हाळ्याच्या तोंडावर रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.