

निनाद देशमुख
वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, कचरा, अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि पायाभूत सुविधांचा अभाव, अशा अनेक समस्यांनी काशेवाडी-डायसप्लॉट प्रभाग (क्र. 22) गेल्या अनेक वर्षांपासून ग्रासलेला आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्नही प्रलंबित असून सार्वजनिक स्वच्छतागृहांचाही अभाव आहे. गेल्या काळात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून प्रभागाचा विकास केल्याचा दावा माजी नगरसेवक करीत असले, तरी विविध समस्या आजही ‘जैसे थे’ असल्याचे नागरिक सांगत आहेत.
प्रभागातील वाहतूक कोंडीची समस्या तर आमच्या पाचविलाच पूजली आहे. प्रमुख रस्त्यांवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते अरूंद आणि अनधिकृत पार्किंगमुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. अनेक व्यावसायिक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे.
गजानन देशमुख, शुभम गायकवाड, रहिवासी
प्रभागात लोहियानगर, काशेवाडी झोपडपट्टी आणि चूडामण तालीम परिसरासारख्या मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. तसेच भवानी पेठ, टिंबर मार्केट आणि गंज पेठ या व्यापारी भागाचाही समावेश आहे. या प्रभागात दाट लोकवस्ती असूनही मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे चित्र दिसून येत आहे. नियोजनाअभावी अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, अस्वच्छता आदी समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्या आहेत. या प्रभागातील सुमारे 65 ते 70 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. एका बाजूला मोठ्या सोसायट्या आणि दुसरीकडे झोपडपट्ट्या, अशी विकासातील दरी या भागात दिसून येत आहे. गेल्या 20 वर्षांत झोपडपट्टी पुनर्वसन कार्यक्रमांतर्गत (एसआरए) काही इमारती उभारल्या असून, त्यामध्ये काही रहिवाशांचे स्थलांतरही करण्यात आले आहे. मात्र निकृष्ट बांधकाम, लिफ्ट, वीज आणि पाण्याच्या समस्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा राजकीय नेत्यांना नंतर विसर पडत असल्याची नागरिकांची भावना आहे.
प्रभागात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे संकलन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने झोपडपट्टींमधील नागरिकांची कुचंबना होत आहे. या स्वच्छतागृहांच्या देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
प्रशांत थोरात, अल्ताफ शेख, रहिवासी
कसबा आणि कॅन्टोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये हा प्रभाग विभागला आहे. गेल्या काळात या प्रभागात कधी भाजप, तर कधी काँग््रेासचे वर्चस्व होते. परंतु दोन्ही पक्षांना या प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्यात यश आले नाही. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नेहरू रोड, भगवा चौक, चमण शहा दर्गा चौक, जुना मोटर स्टँड चौक आणि बनकर तालीम चौकात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. नेहरू रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भवानी पेठ, टिंबर मार्केटचा काही भाग, काशेवाडी, डायसप्लॉट आणि गंज पेठ या भागांमध्ये रस्ते अरुंद आहेत. त्यातच अनधिकृत पार्किंग, अनधिकृत पथारी व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. प्रभागातील नागझरी नाला अतिक्रमणांमुळे अरुंद झाला आहे. काही ठिकाणी तर नाल्यावर स्लॅब टाकून घरे उभारण्यात आली आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये देखील ड्रेनेज लाइनवर बांधकामे झाल्याने पावसाचे पाणी उलट्याच दिशेने वाहत थेट नागरिकांच्या घरात शिरते. टिंबर मार्केटमध्ये पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. या प्रभागातील झोपडपट्ट्यांत घरोघरी जाऊन कचरा संकलनाची सोय नाही. त्यामुळे परिसरात रस्त्यांसह ठिकठिकाणी कचरा साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. गंज पेठेतील जुने वाडे मोडकळीस असल्याने धोकादायक झाले आहेत.
प्रभागातील भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते आणि ड्रेनेज लाइनची कामे करण्यात आली आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहे देखील उभारण्यात आली आहेत. महापालिकेच्या शाळेमध्ये विविध सुविधांची उपलब्धता केली आहे. नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी पीपीपी तत्त्वावर सोनवणे रुग्णालय येथे उभारले आहे.
अर्चना पाटील, नगरसेविका
या वाड्यांच्या जागामालक आणि भाडेकरूंच्या वादामुळे पुनर्विकासाचा प्रश्नच गेल्या काही वर्षांपासून रखडला आहे. लोहियानगर येथे 2009 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजना राबविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 2012 मध्ये येथील 1500 कुटुंबांचे स्थलांतर राजेंद्रनगर, साखर संकुल परिसरात करण्यात आले. या घटनेला 15 वर्षे होऊनही अद्याप या कुटुंबांना त्याच्या मूळ प्रभागात ना एसआरए योजनेची घरे मिळाली ना त्यांचे स्थलांतर पूर्ण करण्यात आले. आजही हे नागरिक दुसऱ्या प्रभागात असून त्यांचे मतदान मात्र प्रभाग क्रमांक 22 मध्ये आहे. लोहियानगर आणि डायसप्लॉटमध्ये ‘एसआरए’ची कामे रखडली आहेत.
प्रभागातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न ’एसआरए’च्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या माध्यमातून विविध समस्या सोडण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जातीचे राजकारण केले जात असून, विकासकामांबाबत उदासीनताही दिसून येत आहे.
अविनाश बागवे, माजी नगरसेवक
प्रभागात या भागांचा समावेश
लोहियानगर, हरकानगर वसाहत, डायसप्लॉट वसाहत, काशेवाडी झोपडपट्टी परिसर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, चूडामण तालीम, भगवा चौक, चमन शहा चौक, जुना मोटर स्टँड चौक, गुरुनानकनगर, सोनवणे दवाखाना, सावित्रीबाई फुले विद्यालय, गोल्डन ज्युबली टेक्निकल इस्टिट्यूट, ढोलेमळा परिसर, सॅलीसबरी पार्क (पार्ट) आदी.
प्रभागातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. जलवाहिन्या, सार्वजनिक स्वच्छतागृह, शाळा, ड्रेनेजलाइन आदींची कामे केली आहेत. प्रभागात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
मनीषा लडकत, माजी नगरसेविका
प्रभागातील प्रमुख समस्या
झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले
नेहरू रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी
झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव
नागझरी नाल्याला अतिक्रमणांचा विळखा
पावसाळ्यात घरांमध्ये शिरणारे पाणी
भवानी पेठ, टिंबर मार्केटमध्ये निर्माण होणारी पूरस्थिती
जुन्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न
कचरा संकलनात विविध त्रुटी
प्रभागात झालेली विकासकामे
प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण
जलवाहिन्या, ड्रेनेजलाइनची कामे
रस्त्यांवरील पदपथांचे सुशोभीकरण
खेळाडूंसाठी लहुजी वस्ताद क्रीडांगण
एसआयएअंतर्गत झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन
प्रभागातील विविध समस्या सोडवण्यावर भर देऊन विविध विकासकामे केली आहेत. तसेच रस्ते, वाहतूक आणि स्वच्छतेचा प्रश्न सोडविण्यावरही भर दिला. एसआरए प्रकल्प मार्गी लावण्यासाठी देखील पाठपुरावा केला आहे.
रफीक शेख, माजी नगरसेवक