Ajit Pawar News : मी सरकारमध्ये नसतो, तर कालव्याला पाणी सुटलेच नसते : उपमुख्यमंत्री पवार | पुढारी

Ajit Pawar News : मी सरकारमध्ये नसतो, तर कालव्याला पाणी सुटलेच नसते : उपमुख्यमंत्री पवार

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरणातून शिरसाई तलावात पाणी सोडून ते पुढे शिरसाई उपसा सिंचन योजनेद्वारे बारामती तालुक्यातील १४ गावांना मिळावे यासाठी उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे चक्री उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आपल्या मागण्यांसाठी उपोषणाचा अधिकार आहे. परंतु पाण्याची परिस्थिती समजून घ्या, असे आावाहन पवार यांनी केले. बारामतीत एका कार्य़क्रमात पवार यांनी यासंबंधी भाष्य केले. मी सरकारमध्ये नसतो तर निरा उजवा आणि डावा कालव्याला पाणी सुटलेच नसते, असेही पवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळावे यासाठी उंडवडी सुपे येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी तळावर शेतकऱयांकडून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे. १०० पेक्षा अधिक शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत पाणी सोडले जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  मी सरकारमध्ये नसतो तर निरा उजवा आणि डावा कालव्याला पाणी सुटलेच नसते. वीर धरण ३५ टक्क्यांवर गेल्यापासून कालवे सुरु करण्यात आले आहेत. मी अनेकदा धाडसाने निर्णय घेतले आहेत. देवाच्या कृपेने हे धाडस कधी वाया गेले नाही. सध्या भाटघर व निरा देवघर धरण १०० टक्के भरले आहे.
गुंजवणी धरण ९५ टक्क्यांवर गेले आहे. परंतु वीरमध्ये ४५ टक्केच पाणी आहे. वरच्या धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी पातळी वाढेल. परंतु यंदाचे वर्ष पाण्याच्या दृष्टीने थोडे अडचणीचे आहे. मी पुरंदर उपसा सिंचन योजनेला ४० कोटी तर शिरसाईला २० कोटी रुपये मंजूर करून घेत तेथील पंप बदलण्याचे काम सुरु केले आहे. वरवंड तलावातून जनाई योजना चालू केली आहे. थोडा दम धरा, पाणी असताना मी सोडणार नाही, असे होणार नाही. हे पाणी एकट्या बारामतीचे नाही. अन्य तालुक्यांचाही विचार करावा लागतो.
हेही वाचा

Back to top button