मुळशीतील शेतकरी संकटात; शेतीकामांना होतोय विलंब
पिरंगुट, पुढारी वृत्तसेवा: भाताचे कोठार समजले जाणार्या मुळशी तालुक्यामध्ये जून महिना अर्धा संपला तरी पाऊस पडलेला नाही. परिणामी, शेतकर्यांचे चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्यात भाताच्या बियाण्याची पेरणी केली जाते आणि बाकीच्या मशागतीला शेतकरी लागलेला असतो.
परंतु यंदा पावसाने जास्त ताण दिल्यामुळे भारताच्या बियाण्याची पेरणी तर सोडा, बाकीच्या शेतीच्या कामांनाही खूप विलंब होत आहे. परिणामी शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. हवामान खात्याचा अंदाज यंदा 101 टक्के पाऊस पडणार असा असला तरी अद्याप पाऊस पडलेलाच नाही. त्याच्यामुळे भाताचे बी टाकायचे कसे?
वटपौर्णिमेला विधवांना दिला हळदी-कुंकवाचा मान
समजा टाकलेच आणि पाऊस आला नाही तर पुन्हा दुसर्यांदा बियाण्याचा खर्च करावा लागणार असून तसेच संपूर्ण मशागत कष्ट पाण्यात जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यामध्ये सध्या पाऊस नसल्यामुळे शेतामध्ये भाताचे बियाणे टाकण्यापूर्वीच्या मशागतीला वेग आला आहे. यामध्ये बांध घालणे, तुटलेले बांध दुरुस्त करणे अशा प्रकारची कामे सध्या सुरू आहेत.
उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे दुहेरी संकट ओढवणार
पावसाने दडी मारल्यामुळे पुढील सर्व कामे उशिरा होणार आहेत. भारतीय नक्षत्रानुसार जर पिकांची पेरणी झाली नाही तर पिकांना अनेक रोगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकर्याचा पिकाचा उत्पन्नाचा खर्च भरमसाट वाढतो. परिणामी उत्पन्न कमी आणि
खर्च जास्त अशा दुहेरी संकटाला शेतकर्यांना सामोरे जावे लागते. ही परिस्थिती तर यंदा उद्भवणार नाही ना, असे भीतीदायक वातावरण सध्या मुळशी तालुक्यातील शेतकर्यांमध्ये आहे.
हेही वाचा
Covid-19 update | देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, २४ तासांत १२,२१३ नवे रुग्ण