नाशिक : खरीप हंगामाचे सतर्कतेने नियोजन करा; पालकमंत्री यांच्या कृषी व अन्य विभागांना बैठकीत सूचना

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत बोलताना पालकमंत्री भुजबळ. समवेत ना. दादा भुसे, विभागीय महसूल अधिकारी राधाकृष्ण गमे व अधिकारी.
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत बोलताना पालकमंत्री भुजबळ. समवेत ना. दादा भुसे, विभागीय महसूल अधिकारी राधाकृष्ण गमे व अधिकारी.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांचा खरीप हंगाम सहज व सुलभ होण्यासाठी कृषी व संबंधित विभागांनी सतर्कतेने नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, मालेगाव उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, जी. डी. वाघ, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक अरुण कदम यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते. ना. भुजबळ म्हणाले की, शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी कृषिमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधावर खत व बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत सातत्य ठेवण्यात यावे. बोगस खते व बियाण्यांचा पुरवठा करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच वीज वितरण विभागाने कृषिपंपासाठी शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. त्याचप्रमाणे विजेचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी शेतकर्‍यांनीदेखील वीजदेयके वेळेत अदा होतील यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ना. भुजबळ यांनी केले आहे.

हवामान केंद्रांची संख्या वाढवा : खते, बी-बियाणे उपलब्धता आणि नियोजन, बोगस बियाणे, पीकविमा आदी विषयांचा त्यांनी आढावा घेतला. महसूल मंडळनिहाय हवामानाचा अंदाज देणार्‍या केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, या हवामान केंद्रांच्या माध्यमातून बदलत्या हवामानाच्या अंदाजाची माहिती जिल्हा पातळीवर एकत्रित करावी. जेणेकरून हवामानातील बदलाचा व नैसर्गिक आपत्तीचा शेतकर्‍यांना योग्यवेळी अंदाज येऊन त्याद़ृष्टीने शेतकरीवर्ग उपाययोजना करू शकतील. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभापासून गरजू शेतकरी वंचित राहणार नाहीत, त्यांना आवश्यक प्रसंगी वेळेत कर्जपुरवठा व विमा रक्कम अदा केली जाईल यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी प्रयत्नशील राहावे. पीक पद्धती याबाबत
वेळोवळी मार्गदर्शन करण्यात यावे, असेही ना. भुजबळ यांनी या बैठकीत सांगितले.

पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या कृषीमंत्री यांच्या अधिकार्‍यांना सूचना :
शेतकर्‍यांना पेरणीच्या वेळी पीककर्जाच्या माध्यमातून रक्कम उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठक घेऊन शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी पीककर्ज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी बँकांच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत. कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले, नॅनो युरियाचा वापर करून त्याची ड्रोनमार्फत फवारणी करण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्याचा अहवाल नव्याने शासनास सादर करावा, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या द़ृष्टीने आवश्यक प्रमाणात खते, बियाणे व इतर निविष्ठांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खत विक्रेत्यांच्या मागणी व पीक पद्धतीनुसार तालुकानिहाय रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार असून, खतांच्या विक्री व वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका, जिल्हा व विभागनिहाय 17 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी उपाययोजना, नियोजनाच्या सादरीकरणाद्वारे बैठकीत माहिती सादर केली.

मात्र आमदारांची पाठ : जिल्ह्यात विधानसभेचे 15 व विधान परिषदेचे दोन आमदार आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील तीन व मालेगाव मध्यमधील एक आमदार वगळले, तर उर्वरित 11 आमदार हे ग्रामीण भागाचे, पर्यायाने शेतकर्‍यांचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, बैठकीस केवळ कळवण, सुरगाण्याचे आ. नितीन पवार उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news