जळगाव : शेतपिकांची नुकसानभरपाई मिळणार : ना. अब्दुल सत्तार | पुढारी

जळगाव : शेतपिकांची नुकसानभरपाई मिळणार : ना. अब्दुल सत्तार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्थानिक पातळीवर चौकशी करून, नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

शहरात कृषी मेळाव्यानिमित्त ना. अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या योजनांबाबत माहिती देताना ते म्हणाले, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री सन्मान योजना सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात घोषणा केली असून, त्यानुसार तयारी करून पुढच्या वर्षी मार्चपर्यंत योजना लागू करण्याचे संकेत ना. सत्तार यांनी दिले आहेत.

व्यवहार नाही, तर गैरव्यवहार कसा? 

दरम्यान, शिधापत्रिकेत गैरव्यवहाराबाबतचा आरोप आ. अंबादास दानवे यांनी केला असून, त्याबाबत विचारले असता, ना. अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधकांना आता टीका करण्याशिवाय काही कामच उरलेले नाही. राज्य सरकारने गोरगरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी १०० रुपयांमध्ये किट देण्याची योजना सुरू केलेली आहे. यासंदर्भात अजून कुठलाही व्यवहार झालाच नाही, तर गैरव्यवहार होणार कुठून, लोकांपर्यंत अजून किट पोहचलेलेचे नाही, तर विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधक आता कुठल्याही विषयावर टीका करत असल्याचे ते म्हणाले.

शेतकरी घडवण्यासाठी शाळेतच अभ्यासक्रम…

इंजिनिअर, डॉक्टर, वकील आणि आयएएस अधिकारी होण्यासाठी शिक्षणप्रणाली राबवली जात आहे. मात्र, भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असूनही शेतकरी होण्यासाठी कोणतीही शिक्षणप्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे इयत्ता ५ वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना शेतीविषयक अभ्यासक्रम सुरू करून, त्यासाठी स्वतंत्र तासिकाही घेतली जाणार असल्याचे ना. अब्दुल सत्तार यांनी सांगितले. कृषी विभाग आणि शिक्षण विभागाकडून याबाबत संशोधन करून अभ्यासक्रमास प्रांरभ करणार असल्याचे ना. सत्तार म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button