![नाशिक : पत्रकारांशी मुक्त संवाद सांधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. (छाया : गणेश बोडके)](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2F%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. देशविरोधी काम करणाऱ्या पीएफ्आय सारख्या संघटनांवर बंदी घातली जाईल. गृह खाते त्यांचे काम योग्य रितीने करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथे वक्तव्य केले.
स्वामी नारायण मूर्ती प्रतिष्ठापना सोहळानिमित्त नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली असून जातीयवादाला महाराष्ट्रात कुठलाही थारा देण्यात येणार नाही. केंद्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. तसेच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकारी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
ना. भुजबळांनी स्वरस्वती मातीच्या फोटोविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल ते म्हणाले, ना. भुजबळ काहीही बोलले. तरी आम्ही सरस्वती मातेचा फोटो हटवणार नाही. राज्यामध्ये जनतेच्या मनातील सरकार स्थापन झालेले आहे. जातीयवादाला महाराष्ट्रात कुठलाही थारा नाही. कुणालाही काही वाटेल ते आम्ही करणार नाही. जे जनतेच्या हिताचे असेल तेच काम केले जाईल. हे जनतेचे सरकार असून आम्ही जनतेच्या हितासाठी काम करणार आहे. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार सुहास कांदे उपस्थित होते. मंदिर परिसरात शिंदे गटाच्या समर्थकांकडून बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, आवाज कुणाचा शिवसेनेचा अशा प्रकारच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून निघाला होता.