सांगली : कोल्हापूरप्रमाणे सांगलीत एफआरपीची मागणी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातही उसाला एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवार, दि. 27 रोजी ‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊसदराचा’या यात्रेची सुरुवात आज वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथून झाली. यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे खराडे म्हणाले, ही यात्रा दि. 4 सप्टेंबररोजी कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झाली आहे. बुधवारी ही यात्रा पलूस तालुक्यातील कुंडल येथे येणार आहे. उसासाठी आवश्यक असणार्या, खते, तणनाशके, मजुरी, वीज, पाणीपट्टी, औषधांच्या किमती ज्या पटीत वाढल्या आहेत त्यापटीत प्रतिटन दर वाढताना दिसत नाही. साखरेला चांगला भाव असताना त्या तुलनेत एफआरपीची वाढ झालेली नाही. साखरेचा भाव साडेतीन हजारच्या पुढे गेला आहे. मळी, मोलॅसिस, बी मोेलॅसिस, स्पिरीट, अल्कोहोल, इथेनॉल यांना यावर्षी चांगला भाव मिळत आहेच. पण शेतकर्यांना चांगला भाव देण्याची साखरसम्राटांची मानसिकता नाही. सांगली जिल्ह्यातील उसाचा उतारा कोल्हापूर जिल्ह्यातील उसाइतकाच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार एकरकमी एफआरपी देऊ शकतात. पण सांगली जिल्ह्यातील का नाही. दोन्ही जिल्ह्यात वेगवेगळा न्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही.
त्यांनी पुढे सांगितले की, याशिवाय अनेक कारखानदार वजनात मोठ्या प्रमाणात काटामारी करतात. उतारा चोरी करतात. तोडीसाठी शेतकर्यांना पैसे मोजावे लागतात. सर्व घटकांकडून शेतकर्यांना लुटले जाते. याविरोधात संघटनेने लढाई सुरू ठेवली आहे.