![नाशिक : पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना निवेदन देताना मनसेचे अॅड. रतनकुमार इचम, अंकुश पवार, दिलीप दातीर, सचिन भोसले, सत्यम खंडाळे आदी.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F05%2F%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेत मशिदींवरील अनधिकृत भोंगे तत्काळ उतरविण्याची पुन्हा एकदा मागणी केली.
नागरिकांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचे घटनेत अभिप्रेत आहे. पर्यावरण कायद्यानुसार रात्री 9 नंतर ध्वनिक्षेपकाला बंदी आहे. सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलै 2005 रोजी जनहित याचिकेवर घटनेने कलम 21 अन्वये प्रत्येक भारतीयास दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनिप्रदूषणामुळे व्यत्यय येतो. तसेच लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत लाउडस्पीकर आणि म्युझिक सिस्टिमच्या वापरावर बंदी घातली आहे. भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून, अनेक मुस्लीम देशांत यावर कडक निर्बंध आहेत.
सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांच्या मशिदींवरील भोंग्यांविरोधातील निकालाचे पालन करीत मशिदींवरील भोंगे तत्काळ उतरविण्यात यावे, अन्यथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेतर्फे मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल व याची जबाबदारी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन माळी, योगेश लभडे, सरचिटणीस मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते.