नाशिक (येवला) : येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे विहिरीत पडल्याने जीव धोक्यात सापडलेल्या रानमांजराला शर्थीच्या प्रयत्नांनंतर येथील वनविभागाच्या कर्मचार्यांनी जीवदान दिले आहे. या मोहिमेत एका कर्मचार्याला रानमांजराकडून इजादेखील झाली आहे.
तालुक्यातील बल्हेगाव येथे शेतकरी संजय अशोक जमधडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये रानमांजर पडले असल्याची माहिती शेतकरी जमधडे यांनी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे यांना फोनवर दिली होती. माहिती मिळताच वनरक्षक गोपाळ हरगावकर, गोपाळ राठोड, सुनील भुरुक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सुरुवातीला जाळीच्या साहाय्याने या रानमांजराला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने वनरक्षक गोपाळ हारगावकर व गोपाळ राठोड विहिरीमध्ये उतरले. यावेळी रानमांजराने वनरक्षक हरगावकर यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या उजव्या हाताला चावा घेतला, तरीदेखील आपल्या जिवाची पर्वा न करता, दोन वनरक्षकांनी दोरीच्या साहाय्याने रानमांजराला सुरक्षित वर काढले. त्यानंतर रानमांजराने पुन्हा जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.