![शरद पवार : ‘युपीए अध्यक्षपदामध्ये मला कोणताही रस नाही’](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2Fsharad-pawar.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मागच्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला यानंतर त्यांनी युपीएच्या अध्यक्षपदावरून त्यांनी सुचक वक्तव्य केले आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार (sharad pawar) यांना अध्यक्ष करा असे संजय राऊत यांच्यासह काही नेत्यांनी वक्तव्य केले होते यावर पुर्णविराम मिळाला आहे.
पवार म्हणाले की, मला यूपीएच्या अध्यक्षपदात अजिबात रस नाही. मी त्यात पडणार नाही. ती जबाबदारी मी घेणार नाही, विरोधकांनी एकत्र यायला हवे असे मला वाटते. मात्र तसे होत असताना वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सर्वोच्च नेत्या आहेत. त्यांच्या पक्षाचे २०० हून अधिक आमदार आहेत. राज्याचे नेतृत्त्व त्या सक्षमपणे करत आहेत. राज्यात उत्तम वर्चस्व असलेले पक्ष देशात आहेत. असेही पवार म्हणाले. (sharad pawar)
प्रादेशिक राजकारणात त्यांची ताकद आहे. पण काँग्रेस संपूर्ण देशात आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे अस्तित्व देशभरात आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन वास्तवदर्शी पर्याय समोर ठेवावा लागेल. त्यातून काहीतरी निर्माण होऊ शकेल, असे पवार म्हणाले. तसेच कायमस्वरुपी अध्यक्षपदी राहणारे पुतीन तयार होऊ नयेत अशी आपली इच्छा असल्याचे पवार यांनी म्हटले.
पेट्रोल डिझेलच्या किंमती पूर्वी वाढत होत्या, पण भाजप सत्तेत आल्यापासून रोज तेलाच्या किंमती वाढतात. रोज वाढणाऱ्या तेलामुळे सामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो. वाढत्या इंढन दरवाढीमुळे घरगुती वापरापासून सगळ्याच जीवनावश्यक गोष्टींची महागाई वाढत आहे.
आज सामाजीक ऐक्य संकटात येईल अशी भूमिका या सरकारने घेतली आहे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजण्याची गरज सध्या आहे. देशाची प्रतिमा डागाळेल अशी वागणूक सत्तेत असणाऱ्या भाजपकडून होत आहे.