

मुंबई : निवडणुकीआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने आता केवळ दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. या कर्जमाफीमध्ये तरी पात्र-अपात्रतेचा खेळ न करता, शेतकऱ्यांना नक्की कर्जमाफी कधी देणार हे सांगा, असे आव्हान देतानाच कर्ज काढून फटाके वाजवणारा आणि मृगजळ दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका ठाकरे यांनी केली.
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नव्या अर्थसंकल्पात शेतकरी-सर्वसामान्यांसाठी कोणतीही ठोस योजना नाही. शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देताना 2017 पासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनेचे काय करणार?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना पात्र-अपात्र अट न ठेवता आम्ही सरसकट कालबद्ध पद्धतीने दोन लाखांची कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती. कोरोना सारखी महामारी यावेळी सुरू होती. त्यातही 50 हजार रुपये प्रोत्साहनपर द्यायला आम्ही सुरुवात केली. तेवढ्यात आमचे सरकार पाडले, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतो म्हटले, आता साधी घोषणाही केली नाही. केवळ कंत्राटदारांसाठी ठोस निधीची तरतूद करणारा हा अर्थसंकल्प असल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकरी, मध्यमवर्ग तरुणांसाठी कोणत्याही योजना नाहीत, असे ते म्हणाले.
विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जात असताना सरकारने 300 कोटी झाडे लावण्याची घोषणा केली आहे. हे वृक्ष कुठे लावणार, नकाशावर ही जमीन दाखवा,असे आव्हान त्यांनी सरकारला दिले. वृक्ष लावण्यासाठी जमिनीवर रिझर्व्हेशन टाकणार का? पर्यावरणाची देखभाल कुठे घेतली जाते आहे, अशा प्रश्नांची सरबत्ती करत केवळ आश्वासनांनी पर्यावरणाचे रक्षण होणार नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून 40 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव-खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी व्यक्त केली. विकसित महाराष्ट्र 2047 ची कल्पना व 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षांत भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून 40 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव-खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी व्यक्त केली. विकसित महाराष्ट्र 2047 ची कल्पना व 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्न आहे. मागील काही वर्षांत भाजपा युती सरकार अर्थसंकल्प जाहीर करते व नंतर येणाऱ्या प्रत्येक अधिवेशनात कोट्यवधी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातात. आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दिवाळखोरीकडे जात असल्याचे दिसून आले असल्याचे ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प भावनिक मुद्द्यांवर आधारित असून विकासाच्या कामांबाबत ठोस तरतुदी नाहीत. देव-देवता, किल्ले आणि स्मारकांच्या घोषणांमुळे भावनिक वातावरण तयार केले आहे. मात्र रस्ते, विकासकामे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ठोस उपाययोजना दिसत नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली.