

Amol Mitkari NCP Internal Rift News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून सध्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. मात्र, या प्रकरणावर सभागृहात चर्चा घडवून आणण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांमध्ये दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली असून, पक्षांतर्गत अस्वस्थतेवर भाष्य केले आहे.
अमोल मिटकरी यांनी पुढारी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलताना आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. ते म्हणाले की, "दादांच्या अपघाताबाबत पहिल्या दिवसापासून आम्ही सर्व आमदारांनी मिळून जोर लावायला हवा होता. केवळ पत्रव्यवहार करून चालणार नाही. जर सर्व आमदार एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा नागरी विमानचालन मंत्र्यांना भेटले असते, तर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही."
आमदारांमध्ये दोन गट पडल्याच्या चर्चेवर मिटकरी यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "मी पक्षात 'गट' आहेत असे म्हणणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे आणि आम्ही सर्व एक आहोत. पण हे खरं आहे की, काही आमदार या विषयावर बोलत आहेत, तर काही गप्प आहेत. बोलणारा वेगळा आणि न बोलणारा वेगळा असं म्हणता येणार नाही, पण अजित दादांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी एकत्र येऊन आक्रमक व्हायला हवे होते," असे मिटकरी म्हणाले.
सरकारमधील सहभागी पक्ष असूनही चर्चा का टाळली जातेय, यावर बोलताना मिटकरींनी सुचवले की, जर सरकारने चर्चा लावली नसेल, तर आम्ही पायऱ्यांवर बसून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करायला हवे होते. असे केले असते तर सत्तेत असलेल्या मुख्यमंत्र्यांनाही त्याची दखल घ्यावी लागली असती.
अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी नुकताच लिफ्टचा प्रवास टाळून १८ मजले चालत जाणे पसंत केले. यावर मिटकरी म्हणाले की, "राजकारणात वावरताना आता प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे आहे. दादा स्वतः नेहमी अखंड सावध असायचे, पण त्या दिवशी विजिबिलिटी नसतानाही त्यांना विमानात बसण्यास कोणी सांगितले, हे अजूनही एक मोठे कोडं आहे."
थोडक्यात, पक्षात उघड गटबाजी नसल्याचा दावा मिटकरी करत असले, तरी दादांच्या अपघात प्रकरणावरून काही आमदारांची 'थंडी' भूमिका त्यांना खटकत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे.