

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार कमी भाव, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान यावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. त्यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्य आणि केंद्र सरकार मात्र प्रचारात व्यस्त आहे. (Jayant Patil )
जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
"राज्य आणि केंद्र सरकारने मराठवाडा, विदर्भातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. इतका निच्यांकी बाजारभाव शेतमालाला दिला जातोय. परतीचा पाऊस समाधानकारक झालेला नाही, त्यामुळे रब्बी पिकांकडूनही फारशी अपेक्षा नाही. सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षाही कमी आहेत याला सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण कारणीभूत आहे. सरकारने गेल्या वर्षभरात खाद्यतेल आयातीवरील शुल्क ३५ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आणले. यामुळे देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात झाले. परिणामी सोयाबीनचे देशांतर्गत भाव पडले.
देशातील कापूस पिकाला यंदा पाऊस आणि कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळं उत्पादन ३०३ लाख गाठींवरच स्थिरावले. देशातील कापूस उत्पादन २००९-१० नंतर पहिल्यांदाच या पातळीवर पोहोचले. शेतकरी संकटात सापडलेला असताना केंद्र आणि राज्य सरकार मात्र प्रचार करण्यात व्यस्त आहेत, हे दुर्दैव म्हणावे लागेल."
हेही वाचा