Nawab Malik : 'बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज केसमध्ये अडकवण्यासाठी समीर वानखेडेंची वेगळी टीम' | पुढारी

Nawab Malik : 'बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज केसमध्ये अडकवण्यासाठी समीर वानखेडेंची वेगळी टीम'

मुंबई : पुढारी ऑनलाईन

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात रोज नवीन नवीन गौफ्यस्फोट केले जात आहेत. या प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. आता नवाब मलिक यांनी नवीन एक ट्विट करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निनावी नावाने एनसीबी अधिकाऱ्याकडून आलेल्या पत्राचा मजकूर नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे उघड केला आहे. ‘समीर वानखेडे यांना नेहमी मीडियात चर्चेत रहावे वाटते. यासाठी त्यांनी अनेक निर्दोष लोकांना एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे. खोट्या केसेस बनविण्यासाठी समीर वानखेडे यांनी आपली एक वेगळी टीम तयार केली आहे,’ असे पत्रात नमूद केले आहे. ज्याने निनावी नावाने पत्र लिहिले आहे त्याने आपण एनसीबीचा एक कर्मचारी असल्याचे नमूद केले आहे.

मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षी एनसीबीकडे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली. माजी महासंचालक राकेश अस्थाना यांनी एसआयटी स्थापन करत कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचे प्रभारी बनविले. आणि त्याच्याकडे ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी दिली. यादरम्यान समीर वानखेडे मुंबईत महसूल गुप्तचर संचालनालयात काम करत होते. गृहमंत्री अमित शहा यांना सांगून समीर वानखेडेला एनसीबी मुंबईत नियुक्त केले. साम, दाम, दंड या तंत्राचा अवलंब करत बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणांत अडकवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वानखेडे, केपीएस मल्होत्रा यांना देण्यात आले, असे पत्रात नमूद केले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

दरम्यान, नवाब मलिक ((Nawab Malik) यांनी पत्रपरिषद घेऊन आणखी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. वानखेडेंच्या प्रमाणपत्रांबाबत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हिंदु, मुस्लिम असा वाद केला नाही. समीर वानखेडे याने बोगस प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली. एनसीबीमध्ये चुकीच्या माध्यमातून काम सुरु आहे. त्याची चौकशी व्हावी. मला मिळालेलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. २६ प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button