पहिली ते चौथीचे वर्ग होणार सुरू; ‘या’ तारखेनंतर वाजणार घंटा? | पुढारी

पहिली ते चौथीचे वर्ग होणार सुरू; ‘या’ तारखेनंतर वाजणार घंटा?

मुंबई, पुढारी ऑनलाईन

राज्यातील पाचवी ते बारावी आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर शाळेबाबत निर्णय होईल. कदाचित दिवाळीनंतर शाळा सुरू होऊ शकतात असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी घेतली. यावेळी पहिली ते चौथीपर्यंतचे सवर्ग सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. गेल्या दोन वर्षांपासून मुले शाळेपासून लांब आहेत त्याचा परिणाम त्यांच्य आयुष्यावर होऊ शकतो. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आता शाळा सुरू करावे. अनेक गावांमध्ये शाळा बंद असल्या तरी मुले वर्गात येऊन बसत आहेत. काही शिक्षक त्यांना शिकवत आहेत. त्यामुळे आता तातडीने निर्णय घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी विनंती केली.

या बैठकीबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह बहुतेक सर्वच सीईओंनी धरला. पाचवी ते बारावी सुरू झाल्यापासून कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेतली गेली आहे. पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करतानाही काय काळजी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार वेगळ्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्या जारी केल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेतील. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशीही मी लवकरच चर्चा करणार आहे.’

१५ टक्के फी कपातीबाबत अद्याप निर्णय नाही

कोरोनामुळे मुलांचे गेली दोन वर्षे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. त्यामुळे शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, त्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने निर्णय घेतलेला नाही. ऑनलाईन शाळेचा खर्च पालक करत आहेत, तसेच काही शाळांनी फी भरली नाही म्हणून ऑनलाईन क्लासमध्ये मुलांना समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर गोंधळ असताना शाळा सुरू होत असल्याने पालकांपुढे फीचा विषय चिंतेचा ठरत आहे.

हेही वाचा: 

Back to top button