नितीन गडकरी म्हणाले देशातील पेट्रोल पंप बंद व्हावेत; पर्यायी इंधन उपलब्ध | पुढारी

नितीन गडकरी म्हणाले देशातील पेट्रोल पंप बंद व्हावेत; पर्यायी इंधन उपलब्ध

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

या देशातील पेट्रोल व डिझेल पंप बंद व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलून दाखवले.

मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कच्या सामंजस्य करारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे उभारण्यात येत असलेल्या मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कचा सामंजस्य करार एनएचएलएमएल व जेएनपीटी यांच्यात झाला.

हॉटेल सेंटर पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, एनएचएलएमएलचे सीईओ प्रकाश गौर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस आदी उपस्थित होते.

पेट्रोल, डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बॅरेलवर अवलंबून आहेत. परिणामी भाव वाढत आहेत. भविष्यात पेट्रोलपंप बंद व्हावेत हीच माझी इच्छा आहे. यावरील प्रभावी उपाय म्हणूनच इथेनॉलसारखे पर्यायी इंधन आहे. इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून ते विमानातील इंधनासाठीही यशस्वी झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज आहे. इथेनॉल, सीएनजी, बायो एलएनजी, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या इंधनाचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागणार आहे, असे गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आपल्याला प्रत्येक बाबतीत आत्मनिर्भर व्हायचे आहे. उदबत्तीसाठी चीनहून बांबूची होणारी आयात थांबवली. आता वाराणसीहून बांबू आणता येईल, असे ते म्हणाले.

यावेळी सुनील केदार यांनी गडकरींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. एकदा ठरवले की गडकरी काम पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. ते स्वत: कधी स्वस्थ बसत नाहीत आणि इतरांनाही बसू देत नाही. सतत विकासाचा ध्यास घेऊन ते काम करतात, या शब्दांत त्यांनी गडकरी यांच्या कामाची प्रशंसा केली.

50 हजार रोजगार उपलब्ध होणार

दरम्यान, मल्टी मॉडेल पार्कच्या माध्यमातून वर्धाच्या सिंधी (रेल्वे) ड्राय पोर्ट येथून जगभरात निर्यातीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या 5 वर्षांमध्ये 50 हजार जणांना रोजगार मिळेल, असा आशावाद गडकरी यांनी व्यक्त केला. या पार्कला रेल्वे तसेच समृद्धी तसेच नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे तसेच पार्कमध्ये शीतगृह कंटेनरची व्यवस्था असल्याने फळांसह इतर जीवनाश्यक वस्तूंची नासाडी होणार नाही, असा विश्‍वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Back to top button