Manoj Jarange-Patil: आरक्षण मिळेपर्यंत सरकार निवडणुका घेणार नाही : मनोज जरांगे
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : सरकार आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका घेणार नाही, मराठ्यांचे प्रश्न आले की तुम्ही आचारसंहिता लावणार का ? मग तुमचे टांगे पलटी होतील, आता समाज हुशार झाला आहे. मराठ्यांच्या जीवावर तुम्ही दादा झाले आहात, तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, अशा शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला इशारा दिला. ते आज (दि.१७) पत्रकार परिषदेत बोलत होते. Manoj Jarange-Patil
मराठा समाज बांधवांना विनंती आहे की, १० वी १२ वीची परीक्षा सुरू होईल. त्यामुळे शांततेत आंदोलन करा. विद्यार्थ्यांची गैरसोय करू नका. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाता यायला हवे. विद्यार्थी हे देश आणि राज्याचे भवितव्य आहेत. त्यांना अडचण यायला नको, याची काळजी घ्या. आता आमची शेतीची कामे उरकलेली आहेत. आंदोलन करताना काळजी घ्या, आपल्यात कुणी शिरते का ? याची खबरदरी घ्या. Manoj Jarange-Patil
मुंबईला जायचे अजून ठरलेले नाही. २० आणि २१ तारखेनंतर मुंबईला कधी जायचे ते बघू. २०- २१ ला सरकार सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करते का नाही, ते बघू. त्यानंतर आंदोलन करू, असे ते म्हणाले. सरकारकडून कोणतेही पत्र आलेले नाही, सरकारचे कुणी तरी घेऊन येईल. समाजासाठी उपचार घेणे सुरू आहे. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढला आता त्याच्या कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय थांबणार नाही. बाँबे हैद्राबाद गॅझेट घ्या. शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या. अंतरवालीसह राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्या. याशिवाय माघार घेणार नाही.
मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला. त्यांनी टक्केवारी कशी काढली, मला महित नाही. त्यांच्या मनानेच १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली का? मला माहीत नाही. हा आयोग याच आंदोलनामुळे तयार झाला आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेले १० टक्के आरक्षण वाढवून देण्याची मागणी करण्यास जरांगे यांनी नकार दिला.
आंदोलन आणि शिवजयंती यांचा काही संबंध नाही, पास असणार तोच गडावर जाता कामा नये. सगळ्यांना दर्शन घेता यायला हवे. शिवजयंतीला प्रशासनाने परवानगी दिली तर शिवनेरी किंवा आणखी कुठे रुग्णवाहिकेतून जाता येईल का ?, याचा विचार सुरू आहे.
हेही वाचा