नाना पटोले, "ताट वाजवून संपूर्ण देशात अवकळा आणली" | पुढारी

नाना पटोले, "ताट वाजवून संपूर्ण देशात अवकळा आणली"

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : भाजपचे लोक अत्याचार करतात आणि महाविकास आघाडीला वेठीस धरतात. थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या की, अवकळा आणि औदसा येते असे म्हणतात. तसं यांनी संपूर्ण देशात ताट वाजून औदसा आणली आहे”, अशी टीका काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर केली.

२७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वाजता आयोजित आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुकी दरम्यान आयोजित जाहीर सभेत नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “देशात महागाई बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतीय जनता पार्टीचे सरकार कामगार कष्टकरी शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी एक प्रकारचे हुकूमशाही निर्माण करत आहे. धनदांडग्यांच्या फायद्यासाठी काळे कायदे भाजपा सरकारने लागू केली असून लवकरच हे सरकार बरखास्त करावे लागेल”, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार सभेत बोलताना दिला.

“देशात मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी वाढली असून पेट्रोल-डिझेलचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत. काँग्रेस जनतेचे प्रश्न सोडवण्याचा विचार करून सर्वसामान्यांच्या आणि लोकहिताचे निर्णय घेत आहे. मात्र देशात वेगवेगळ्या समस्या उद्भवून भारतीय जनता पार्टी मूळ प्रश्नांना बगल देत आहे. काँग्रेस पक्षात सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष असून लोकशाही व्यवस्थेचे पालन करून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचे काम करत आहे”, असेही मत नाना पटोले यांनी केले.

“भाजपचे लोक अत्याचार करतात आणि महाविकास आघाडीला वेठीस धरतात. महागाई, रोजगार, पेट्रोल-डिझेलचे दर यासारख्या कित्येक प्रश्नांवर केंद्र सरकार फेल झाली असून देशातील नागरिकांना भ्रमित करण्याचे काम भारतीय जनता पार्टी करत आहे. देशाचं संविधान चालवायचं असेल तर काँगेसशिवाय पर्याय नाही. भाजपाचे सरकार हुकूमशाहीच्या आधारावर कष्टकरी व कामगारांना उध्वस्त करण्याचे काम करते” असा आरोपही केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित झनक, डॉ. वाजाहद मिर्झा,  डॉ. सुधीर ढोणे, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, पिरिपा प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे ,जिल्हा परिषद अध्यक्ष श्याम गाभने, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दिलीपराव सरनाईक, मा. आमदार कांबळे, बाळासाहेब सानप आदींसह काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

दादा मोठा की, नाना मोठा : पटोले

आज वाशिम येथे काँग्रेसचे संवाद मेळावासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पटोले म्हणाले की, दादा आपण मुलाला म्हणतो आणि नाना आपण आईच्या वडिलांना म्हणतो. ही आपल्या महाराष्ट्रातील एक परंपरा आहे त्याच्यावर मी बोललो. कोणावरही टीका केलेली नाही”, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले.

Back to top button