दसरा : सामाजिक एकोपा जपणारा कोल्हापूरचा दसरा | पुढारी

दसरा : सामाजिक एकोपा जपणारा कोल्हापूरचा दसरा

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करणार्‍या शिवछत्रपती आणि स्वराज्य रक्षक रणरागिणी ताराराणी यांचा वारसा सांगणार्‍या ऐतिहासिक दसरा सणाला शतकोत्तर परंपरा आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात कोल्हापूरच्या नवरात्रौत्सव आणि कोल्हापूरचा दसरा सणाला सामाजिक किनार लाभली. त्यांच्या या कार्याचा वारसा आजही ‘शाहूनगरी’ने जपला आहे. करवीर छत्रपतींची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात नेण्यात आली. तेव्हापासून करवीरनगरी कोल्हापूरचा दसरा साजरा होऊ लागला.

कृषी परंपरेत पावसाळ्यातील शेतीची कामे उरकली की, शेतकरी सैनिक बनून मुलूखगिरीवर जायचे. खंडेनवमीला शस्त्रपूजन करू दशमीला विजय साजरा करण्यासाठी सीमोल्लंघन केले जात असे. कालौघात या परंपरेचे स्वरूप बदलून ते प्रतीकात्मक झाले. गावाची सीमा ओलांडून आपट्याची पाने म्हणजे सोने लुटण्याचे कार्यक्रम होऊ लागले. संस्थान काळात सीमोल्लंघनासाठी मिरवणूक काढली जायची. ही मिरवणूक गावाच्या बाहेर गेल्यानंतर सोने लुटण्यासाठी लोक एकत्रित येऊ लागले.

करवीर छत्रपतींचा दसरा…

रणरागिणी ताराराणी यांनी रयतेच्या स्वराज्याचे रक्षण करून आपली राजधानी 1709 च्या दरम्यान पन्हाळगडावर स्थापन केली. पुढे 1788 पर्यंत पन्हाळगडावर दसरा साजरा व्हायचा. पुढील काळात करवीर छत्रपतींची राजधानी पन्हाळगडावरून कोल्हापुरात नेण्यात आली. तेव्हापासून दसरा करवीरनगरी कोल्हापुरात साजरा होऊ लागला.

जुना राजवाड्याभोवताली असणार्‍या कोटातून बाहेरील (तटबंदीच्या बाहेर) गंजीमाळ येथे दसरा होत होता. कलांतराने नवीन राजवाडा बांधला गेला. राजर्षी शाहू महाराज नव्या राजवाड्यात राहायला गेल्यानंतर दसरा सण ‘चौफाळा माळ’ येथे साजरा होऊ लागला. कालांतराने या माळाला दसरा माळ नाव पडले. आज याला ‘दसरा चौक’ या नावाने ओळखले जाते.

पारंपरिक लवाजम्याची भव्य मिरवणूक

दसर्‍या दिवशी राजर्षी शाहू महाराजांच्या काळात जुना राजवाडा ते दसरा चौक अशी भव्य मिरवणूक निघायची. या मिरवणुकीत छत्रपती घराण्यातील व्यक्तींसह सरदार, जहागीरदार, मानकरी यांचा समावेश असायचा. याच बरोबर पारंपरिक लवाजम्यात हत्ती, घोडे, उंट, शिकारखान्यातील वाघ, चित्ते यासह लष्करी दलातील पायदळ-घोडदळ, तोफांचा खडखडा यांचा समावेश असायचा. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हत्तीवर राजघराण्याचं निशाण व जरिपटका असायचा. जुना राजवाड्यातून पारंपारिक मार्गावरून ही भव्य मिरवूणक दसरा चौकात आणली जायची.

कालौघात लवाजम्याचे स्वरूप बदलले

कालौघात लवाजम्याचं स्वरूप बदलले; मात्र मिरवणुकीचा थाट आजही कायम आहे. हत्ती-घोडे-उंटांची जागा स्वयंचलित वाहनांनी घेतली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी जर्मनीतून आणलेली ’मेबॅक’ गाडी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या मेबॅकमधूनच छत्रपतींचे आगमन दसरा चौकात होते. सायंकाळी सूर्यास्तावेळी शमीपूजनाचा पारंपरिक सोहळा छत्रपतींच्या हस्ते झाल्यानंतर तोफ वाजते. यानंतर आपट्याची पाने म्हणजे सोने लुटण्याचा सोहळा होतो. यावेळी दसरा चौकात हजारो लोक उपस्थित असतात.

सामाजिक एकोप्याचा सण

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी धार्मिक व पारंपरिक स्वरूपाच्या दसरा सणाला सामाजिक स्वरूप प्राप्त करून दिले. ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ध्येय-उद्देशाने राज्य कारभार करून जाती-धर्म भेदभाव नष्ट करण्यावर भर दिला. माणुसकीला महत्त्व दिले. नवरात्रौत्सवानिमित्त दररोज निघणारी तुळजाभवानीची पालखी पारंपरिक मार्गावरून न नेता बारा बलुतेदार लोकांच्या वस्तीतून नेल्या. नवरात्रीत दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांतून ही पालखी फिरविण्यात आली. यामुळे सर्व जाती-धर्मांतील लोक या सोहळ्याला जोडले गेले. नवरात्रौत्सवाबरोबरच शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांच्या रथोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा व प्रबोधनावर भर दिला.

Back to top button