शिरोळ : अब्दुललाटमध्ये 'स्वाभिमानी'तर्फे शासन निर्णयाची होळी
अब्दुललाटमध्ये ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेतर्फे शासन निर्णयाची होळी करण्यात आली. अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ही होळी करण्यात आली. राज्य सरकारने नुकताच पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून प्रतिगुंठा १३५ रुपये नुकसान भरपाई जाहीर केलीय. असा प्रकार करून सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केलीय. बळिराजाचा विश्वासघात केल्याने ‘स्वाभिमानी’ ने राज्य सरकारचा जाहीर व तीव्र निषेध करत शासन निर्णयाची होळी केली. तसेच राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देत कॅन्डल मार्च देखील काढणार असल्याचे जाहीर केले.
जुलै २०१९ मध्ये आलेला महापूर, अतिवृष्टी व कोरोनामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. २०२१ च्या महापुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हे पाहता राज्य शासन काहीतरी चांगले निर्णय घेईल असे वाटत होते.
पण, नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार संदर्भादिन क्रमांक तीन येथील शासन निर्णय या विहित केलेल्या दरानुसार जी.आर काढला आहे. तो फसवा आणि शेतकऱ्यांना देशोधडीस लावणारा आहे. याचा जाहीर व तीव्र शब्दांत निषेध करत होळी करण्यात आली.
यावेळी राजेंद्र नाईक, सुमतिनाथ शेट्टी, महावीर गिरमल, शितल कुरणे, राजकुमार गिरमल, कॉम्रेड आप्पा पाटील, सुरेश शेडबाळे, अरुण शेडबाळे, लकी पाटील, मनोज चौगुले, राजेंद्र आवटे कार्यकर्ते उपस्थित होते.