कोल्हापूर : अंगावर हळद कुंकू टाकून मुलाचा खून, काय आहे प्रकरण? | पुढारी

कोल्हापूर : अंगावर हळद कुंकू टाकून मुलाचा खून, काय आहे प्रकरण?

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राजेश केसरकर या पाच वर्षाच्या बालकाचे अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीला आली. धक्कादायक म्हणजे निष्पाप बालकाच्या मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल आढळून आला आहे. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या घटनेचा वेगाने तपास सुरू केला आहे.

सोनाळी (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्या प्रकरणाला दीड महिना होऊनही त्याच्या हत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. ही घटना ताजी असतानाच शाहुवाडी तालुक्यात आणखी एका बालकाच्या हत्येने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. या अमानुष आणि क्रूर घटनेमुळे शाहुवाडी तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी मारेकर्‍यांचा तातडीने छडा लावून त्याला बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजता आरव मित्रांसमवेत अंगणात खेळत होता. साडेसहा वाजता तो अचानक बेपत्ता झाला. नातेवाईकांनी शोध घेतला पण रात्री उशिरापर्यंत आरव सापडला नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आरव मृतदेह आढळून आल्यानंतर घरच्यांनी आक्रोश केला. मृतदेहावर हळद कुंकू, गुलाल टाकल्याने हा नरबळीचा प्रकार असावा अशी नातेवाईकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शंका आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहेत. निष्पाप आरवचे कोणी आणि कशासाठी अपहरण केले हा तपासाचा मूळ मुद्दा आहे. खुनानंतर मृतदेहावर हळद कुंकू टाकल्याने या प्रकरणामागे कोणाचा हात आहे. याचाही पोलीस शोध घेत आहेत.

वरद पाटील खुनाचे गुढ कायम….

सोनाळी (ता. कागल) येथील वरद पाटील या बालकाच्या हत्या प्रकरणाला दीड महिना उलटला आहे. सात वर्षीय वरद रवींद्र पाटील याची अमानुष हत्या नरबळी की अन्य कोणत्या कारणातून झाली, यावर वेगवेगळे प्रवाह असले तरी तपास यंत्रणेने नरबळीचा स्पष्ट इन्कार केला आहे. त्यामुळे खुनामागे दडलेल्या कारणाचे गूढ वाढले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button