राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार बाळासाहेब ठाकरे स्मारक उद्यान: राजेश क्षीरसागर | पुढारी

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार बाळासाहेब ठाकरे स्मारक उद्यान: राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या ६ मे २०२२ रोजी होणार्‍या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य व विचारांच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम घ्यावेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृती स्मारक उद्यान उभे करून त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, संग्रहालय, खाद्यपदार्थ विक्री केंद्र, ओपन जिम, व्यंगचित्रांचे दालन आदी विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावीत, असे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले.

या बाळासाहेब ठाकरे स्मारक उद्यान याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

पुरवठ्यापेक्षा जादा तिप्पट ऑक्सिजन साठा उपलब्ध करा…

ओपन जिमसारखी लोकोपयोगी व जनहिताची कामे जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यासाठी प्राधान्य देतानाच कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात पुरवठ्यापेक्षा तिप्पट ऑक्सिजन साठा उपलब्ध होईल यासाठी नियोजन करावे. प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यावर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी दिल्या.

तब्बल दहा वर्षांनंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात कोकण महसूल विभागातील ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या सूचनांचा विचार करू…

क्षीरसागर यांनी योजना व त्यांच्या निधी खर्च करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या सूचनांचा नक्कीच नियोजन मंडळ विचार करून बदल करेल, अशी ग्वाही दिली.

जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत जनहिताच्या कामाला प्राध्यान्य, अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेचा निधी त्याच योजनेसाठी व त्याच कामासाठी खर्च करण्याच्या सूचना केल्या.

कोरोना प्रतिबंधक उपायांचा आढावा…

यावेळी २०१८ ते २०२०-२१ या वर्षांतील नावीन्यपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला. २०२०-२१ व २०२१ -२२ या आर्थिक वर्षातील खर्चाचा जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय आढावा घेतला.

कोकण विभागाचे उपायुक्त (नियोजन) संजय पाटील, ठाणे जिल्ह्याचे नियोजन अधिकारी अमोल खंडारे व इतर जिल्ह्यांचे नियोजन अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

Back to top button