भुदरगड मेघोली तलाव फुटला; महिलेचा मृत्यू, सहा जनावरांसह वेंगरूळ पूल गेला वाहून | पुढारी

भुदरगड मेघोली तलाव फुटला; महिलेचा मृत्यू, सहा जनावरांसह वेंगरूळ पूल गेला वाहून

गारगोटी ; पुढारी वृत्तसेवा : मेघोली (ता. भुदरगड) येथील लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फुटला. यामुळे पाच गावांना धोका निर्माण झाला आहे. त्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याच्या प्रवाहाने वेंगरूळ-ममदापूरदरम्यान ओढ्यावरील पूल तसेच नवले येथील सहा जनावरे वाहून गेली आहेत. दरम्यान, जिजाबाई धनाजी मोहिते (वय 55, रा. नवले) यांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला.

मेघोली लघू पाटबंधारे तलाव 22 जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरला होता. तलावात 98 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता.

तलाव बांधल्यापासूनच पायातून गळती लागली होती. त्यामुळे तलाव दुरुस्तीचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे सादर केला होता.

गेल्या काही दिवसांपासून तलावाच्या गेटजवळून पाणी गळती वाढली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने वाळूची पोती ठेवली होती व नागरिकांनाही माहिती दिली होती.

बुधवारी रात्री ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने मेघोली ग्रामस्थांनी प्रशासनाला माहिती दिली.

तलाव फुटल्याने मुळासह झाडे उन्मळून पडली आहेत, तर विजेच्या खांबांसह उभी पिके भुईसपाट झाली आहेत.

उपअभियंता संभाजी भोपळे, शाखा अभियंता समीत्रराजे शिर्के, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मेघोली, नवले, वेंगरूळ, शेळोली या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. या घटनेमुळे पाच गावांतील नागरिक तणावाखाली आहेत.

भुदरगड मेघोली तलाव फुटला वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

नवले येथील ओढ्याशेजारील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. ओढ्याकाठची ऊस, भातपिके पाण्याखाली गेली आहेत. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

अंधारातून वाट काढत जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

सुमारे 50 मीटर लांबीची भिंत तुटून गेली आहे. तर गारगोटी-वेसर्डे मार्गावरील वेंगरूळ ओढ्यावरील पूल पाण्याच्या प्रवाहाने तुटून गेला.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी पोलिस यंत्रणेला लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ, पाटबंधारे कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

2000 साली हा तलाव बांधला होता. यामुळे मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरूळ या चार गावांतील 400 हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होत होता. तलाव फुटल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

Back to top button