नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माहिती दिली.
गुरूवारी नागपुरात विमानतळावर आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
राज्यातील शाळा सुरू करण्याच्या बाबतीत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. मात्र, शाळा सुरू करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसांत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
मंत्री बच्चू कडू म्हणाले की, शाळा दिवाळीनंतर सुरू करायची की आत्ता सुरू करायची यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय होईल. त्यासाठी आरोग्य विभाग आणि टास्क फोर्ससोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार होती, पण टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याला स्थगिती देण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या काही भागांमध्ये एकदम कमी आहे, पण अजूनही काही जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती पाहता धोका कमी झाला नाही, असे ते म्हणाले.
शाळा सुरू झाली पाहिजे, असे सर्वांना वाटत आहे. पण, केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका आहे, यामुळे कुठलाही निर्णय घेताना सर्व बाबी लक्षात घ्यावा लागणार आहेत असेही बच्चू कडू यांनी सांगितले.