जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : चिंचवाड (ता.शिरोळ) येथे पूर्ण गावात कृष्णा नदीचे पाणी असतानाही तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह तब्बल २६० नागरीक अडकले आहेत. त्याचबरोबर ६० जनावरेही अडकली आहेत.
नागरिकांची आणि जनावरांची सुटका लवकर व्हावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे. चिंचवाड येथे २००५, २०१९ यानंतर आता २०२१ ला संपूर्ण गावाला कृष्णा नदीच्या महापूराचा वेढा पडला आहे. २०१९ मध्ये तब्बल ३५० नागरिक अडकले होते.
त्यावेळी मोठ्या प्रयत्नानंतर बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या पुराचा अनुभव गाठीशी असतानाही चिंचवाड गावामध्ये सध्या २६० नागरिक पुराच्या पाण्यात अडकुन पडले आहेत.
चिंचवाडला अर्जुनवाड, शिरोळ, उदगाव, या तिन्ही मार्गावर कृष्णानदीचे पाणी आल्याने शनिवारी सर्व रस्ते बंद झाले आहेत. तर येथील ग्रामविकास अधिकारी हणवते, तलाठी तमायचे, आरोग्य सेवक मुजावर हेही पुरातच अडकले आहेत.
या अधिकार्यांनी नागरिकांना शनिवारी सकाळी बाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची गरज होती. तसेच स्वत: बाहेर येऊन स्थलांतर झालेल्या २२०० नागरिकांची सोय गरजेचे होते.
सर्व नागरिक आणि जनावरांना चार्याची व्यवस्था करण्याऐवजी स्वतः च तलाठी व ग्रामसेवक पुरात अडकले आहेत. त्यामुळे रविवारी जनावरांच्या चारा, नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
आम्हाला प्रशासनाने तात्काळ बाहेर काढावे, अशी मागणी पुरात अडकलेल्या नागरिकांनी केली आहे. जयसिंगपूर येथील काही भागांत अजूनही काही ठिकाणी पूराचे पाणी आहे. तसेच त्यामध्ये नागरिक अडल्याने लवकरात लवकर प्रशासनाने पाऊलं उचलून नागरिकांना बाहेर काढावे, अशी विनंती लोकांकडून होत आहे.
पहा व्हिडीओ : पाणी ओसरतंय. पण, कोल्हापुरकर काळजी घ्या…
हे वाचलंत का?