इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार?; प्रस्ताव सादर करण्याचा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आदेश

Tehsil
Tehsil

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहराला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यासह याठिकाणी तहसिल कार्यालय सुरु करण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. यामुळे प्रदीर्घकाळापासून प्रलंबित असलेला प्रश्‍न मार्गी लागला असून इचलकरंजी आता स्वतंत्र तालुका होणार असल्याचेही आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी शहराचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या 8 लाखापेक्षा अधिक आहे. सध्या इचलकरंजी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. या अप्पर तहसिलदार कार्यालयाच्या कक्षेत कबनूर, कोरोची, रांगोळी, रेंदाळ व पट्टणकोडोली या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इचलकरंजी महानगरपालिका व हुपरी नगरपालिका यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

इचलकरंजी येथे उपविभागीय (प्रांत) कार्यालय, जिल्हा व सत्र न्यायालये, पोलिस उपअधिक्षक कार्यालय, तीन पोलिस ठाणी व इतर सरकारी आस्थापना अशी अनेक महत्वाची कार्यालये आहेत. हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र इचलकरंजीत तहसिलदार कार्यालय नाही. तहसिलदार कार्यालय हे हातकणंगले याठिकाणी असले तरी त्या तुलनेत जवळपास 60 टक्के काम हे इचलकरंजीतील अप्पर तहसिलदार कार्यालयात होत आहे. त्यामुळे इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे आहे असे आमदार आवाडे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news