पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणी सावरकरांवर प्रश्न निर्माण केले म्हणून कोणी नेहरुंवर प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. निदान सावरकरांच्या वंशजानी तरी ही चूक करू नये, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. भाजप आणि मिंधे गटाचं सावरकर प्रेम अचानक उफाळून आलं आहे, असंही वक्तव्य करत त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
गेले काही दिवस कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेत सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु आहे. यासंबधी आज सकाळी माध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आपल्या सुखाचा त्याग केला आहे, बलिदान दिलं आहे त्यांच्याबद्दल अभिमान आहे आणि कायम राहीलही. सावरकर वंदनीय, प्रिय आहेत आणि कायम राहतील. जे लोक आता त्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी हयात नाहीत त्यांच्यावर का आरोप करायचे आणि ती परंपरा आपली नाही आहे, असेही ते म्हणाले.
पं. जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, मौलाना आझाद, लाल बहाद्दुर शास्त्री, सावरकर या सर्वांचे योगदान आहे. आणि ते आपण विसरायला नको. सावरकर आमच्यासाठी वंदनीय आहेत. सावरकर विज्ञाननिष्ठ असे म्हणतो त्या अंगाने देश घडवण्यात नेहरुंच योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर भारत घडवण्यात नेहरुंच योगदान मोठं आहे. नेहरु नसते तर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. पाकिस्तानमध्ये जशी धर्मांधता आहे, तशी स्थिती झाली असती. असेही ते म्हणाले.
हेही वाचा