नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून गुंडशाही तसेच धार्मिक दंगली घडवून आणल्या जातात, असा आरोप एका सर्वेक्षणाचा दाखला देत राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी केला आहे. या सर्वेक्षणात ९१% नागरिकांनी गुंडशाही तसेच दंगलीकरीता भाजप जबाबदार आहे असा दावा देखील सिसोदियांनी केला.
२१ एप्रिल पासून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून ३ प्रश्न विचारण्यात आले होते. दोन आठवड्यांपर्यंत चाललेल्या सर्वेक्षणातून दिल्लीतील ११ लाख ५४ हजार २३१ लोकांनी त्यांचे मत नोंदवले. सर्वेक्षणातून ९१% नागरिकांनी भाजपला, ८% नागरिकांनी कॉंग्रेसला तर, १% सर्वेक्षणदात्यांनी इतर पक्षांना गुंडशाही आणि धार्मिक दंगलींसाठी जबाबदार धरल्याचे सिसोदिया म्हणाले.
सर्वाधिक अशिक्षित लोक भाजपमध्ये असल्याचे मत ८९% लोकांनी नोंदवले. ५% लोकांनी कॉंग्रेस, २% लोकांनी आम आदमी पक्ष आणि ४% लोकांनी इतर पक्षामध्ये सर्वाधिक अशिक्षित लोक असल्याचे मत नोंदवल. विशेष म्हणजे ७३% लोकांनी आम आदमी पक्षात सर्वाधिक सभ्य, सुशिक्षित लोक असल्याचे मत नोंदवले. तर, १५% नागरिकांनी कॉंग्रेस आणि १०% लोकांनी भाजप, २% नागरिकांनी इतर पक्षांमध्ये सुशिक्षित आणि सभ्य लोक असल्याचे मत नोंदवले आहेत, असे सिसोदिया म्हणाले.
हेही वाचा