पेट्रोलसाठी २ दिवस रांगेत थांबावं लागलं, श्रीलंकेच्या क्रिकेटरनं सांगितली देशातील भयावह स्थिती

पेट्रोलसाठी २ दिवस रांगेत थांबावं लागलं, श्रीलंकेच्या क्रिकेटरनं सांगितली देशातील भयावह स्थिती

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा फटका सर्वसामान्यांसह खेळाडूंना बसत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर चमिका करुणारत्ने (Sri Lankan cricketer Chamika Karunaratne) देशातील आर्थिक संकटामुळे अस्वस्थ झाला आहे. त्याला आलेला अनुभव त्याने कथन केला आहे. कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी तब्बल २ दिवस रांगेत उभे राहिल्याचे त्याने म्हटले आहे. चमिका करुणारत्ने याने ANI शी बोलताना म्हटले आहे की, दोन दिवस रांगेत थांबल्यानंतर मला कारमध्ये पेट्रोल भरण्यास मिळाले. मी कारमध्ये १० हजार रुपयांचे पेट्रोल भरले असून ते कसेबसे २-३ दिवस पुरेल.

"दोन दिवस लांब रांगेत थांबल्यानंतर सुदैवाने पेट्रोल मिळाले, इंधनाच्या प्रचंड तुटवड्यामुळे मी क्रिकेट प्रॅक्टिससाठी जाऊ शकत नाही," असे त्याने म्हटले आहे. श्रीलंका या वर्षी ऑगस्टमध्ये आशिया कप २०२२ चे यजमानपद भूषवणार आहे. पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण देश इंधनाच्या तीव्र टंचाईसह आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

"आशिया चषक जवळ येत आहे आणि यावर्षी एलपीएलचे (LPL) देखील नियोजित वेळापत्रक आहे. मला माहित नाही की काय होईल. कारण मला प्रॅक्टिससाठी कोलंबो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागेल आणि क्लब सीझनमध्येही सहभागी व्हावे लागेल. इंधनाच्या कमतरतेमुळे मी क्रिकेट प्रॅक्टिससाठी जाऊ शकत नाही. २ दिवसांपासून मी कुठेही गेलेलो नाही कारण, पेट्रोल मिळवण्यासाठी दोन दिवस मला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागले. अखेर मला ते मिळाले. पण १० हजार रुपयांचे भरलेले पेट्रोल जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसच पुरेल, असे चमिका करुणारत्ने याने म्हटले आहे.

चमिकाने श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटाबद्दल मत व्यक्त केले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर सध्याचे सरकार शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सक्षम आहे का? असे विचारले असता त्याने म्हटले आहे, "मी यावर जास्त काही सांगू शकत नाही. परंतु देशात सध्या जे काही चालले आहे ते काहीही चांगले नाही. मला आशा आहे की जेव्हा चांगले लोक येतील. तेव्हा काहीतरी चांगले घडेल. लोकांना योग्य व्यक्तीची निवड करावी लागेल. त्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळू शकेल आणि परिस्थिती निश्चितपणे सुधारेल." भारत आमच्यासाठी भावासारखा आहे, आम्हाला खूप मदत करतो, असेही त्याने म्हटले आहे.

ANI ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने म्हटले होते की, "क्रिकेट कोणत्याही परिस्थितीत सुरु रहायला हवे. जयसूर्याने यावेळी ऑस्ट्रेलिाचा क्रिकेट कर्णधार आणि उच्चायुक्तांचे आभार मानले होते. कारण त्यांनी देशात कठीण परिस्थिती असतानाही कसोटी सामना रद्द केला नाही, असे त्याने नमूद केले होते.

श्रीलंकेने नुकतेच ऑस्ट्रेलिया सोबतच्या तीन फॉरमॅटमधील मालिकेसाठी यजमानपद भूषवले होते. ही मालिका अत्यंत चुरशीची झाली आणि दोन्ही बाजूंनी चांगला खेळ पहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने T20 मालिका २-१ ने जिंकली आणि एकदिवसीय मालिका श्रीलंकेने 3-2 ने जिंकली. तर दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news