मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) शुक्रवारी (दि.०८) सकाळी प्रचंड गोंधळ आणि गर्दी पहायला मिळाली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. या गैरव्यवस्थापनाचा फटका प्रवाशांना बसला असून, ४० हून अधिक प्रवाशांची फ्लाईट मिस झाली.
निर्बंधात दिलेली शिथिलता आणि लसीकरणाचा वाढलेला वेग यामुळे विमान प्रवासाच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यातचा सध्या टर्मिनल 2 वरूनच सर्व विमानांचे उड्डाण आणि आगमन होतं आहे. शुक्रवारी सकाळी टर्मिनल २ वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली.
विमानतळाचे प्रवेशद्वार आणि चेक इन काउंटरवर सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने प्रवाशांच्या लांबलचक रांगा लागल्या. हळूहळू या रांगा इतक्या वाढल्या की विमान सुटण्याची वेळ झाली तरी प्रवाशांना आत प्रवेश मिळाला नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी सुरक्षारक्षक आणि विमानतळ व्यवस्थापकांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
काही जणांनी तर 'क्यू लॉक' तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
याच दरम्यान 6E5731 मुंबई हैदराबाद हे विमान १५ हून अधिक प्रवाशांना वेळेत पोहोचता न आल्याने त्यांना न घेताच निघून गेले. अन्य १५ ते २० प्रवाशांसोबतही असाच प्रकार घडला.