बिहार विधासभेत दारुच्या रिकाम्या बाटलीने रणकंदन माजले. बिहारमध्ये दारुबंदी असतानाही विधानसभेच्या आवारात बाटली सापडल्याने त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी ही बाटली विधानसभेच्या आवारात कशी आली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
बिहार विधानसभेच्या आवारात मंगळवारी दारुची बाटली सापडली. मंगळवारी त्यावरून विधानसभेत रणकंदन माजले. बाटली सापडल्यावरून विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री नितीश कुमारही चांगलेच भडकले. या प्रकाराची माहिती मला पत्र पाठवून द्या मी त्याची दखल घेतो. तुम्ही सोशल मीडियातून आणि बातम्यांतून हे का सांगता असा सवाल यादव यांना केला. दोघेही नेते एकमेवांवर आरोप प्रत्यारोप करत असताना अध्यक्षांनी हस्तक्षेप करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
तेजस्वी यादव यांनी हा प्रकार गंभीर आहे, असे सांगत सरकारवर टीका केली. त्यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, जर विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली तर याची चौकशी करू. मी आत्ताच सर्व विभागाच्या सचिवांपासून डीजीपीपर्यंत सर्वांना चौकशीचे आदेश देतो.
नितीशकुमार यांचे बोलणे संपते ना संपते तोच यादव उठून उभे राहिले आणि बाटली कशी आली ते आधी सांगा असे मुख्यमंत्रांना बोलू लागले. यावर मुख्यमंत्र्यांनी 'तुम्ही सोशल मीडियातून आलेल्या कुठल्याच गोष्टीला सरकार महत्त्व देत नाही. तेजस्वी यादव यांना माझा स्वभाव माहीत नाही. जे पत्र लिहायचे आहे ते थेट मला लिहावे. माध्यमांतून, सोशल मीडियातून आलेल्या गोष्टींना मी उत्तर देणार नाही.'
यावेळी बराच वेळ दोघांत जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी रिकामी बाटली कशी आली याच्या चौकशीचे आदेश दिले. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक करावाई करावी, असे आदेशात म्हटल आहे.
यानंतर नितीशकुमार तडक आपल्या चेंबरमध्ये गेले. त्यांनी मुख्य सचिव चंचल कुमार यांना बोलावून घेत या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा :