अमरीश पुरी : एलआयसीमध्ये काम करणारा हा अभिनेता चित्रपटात कसा आला?
आजही "मोगॅम्बो खूष हुवा" हा डायलॉग कानावर पडला तरी आपल्याला अमरीश पुरी यांचा चेहरा समोर येतो. नव्वदच्या दशकात अमरीश पुरी यांनी खलनायकाची भूमिका गाजवली होती. त्यांच्या अभिनयाचा एवढा जबरदस्त परिणाम झाला की, सर्वसामान्य लोक त्यांना खलनायकाच्या नजरेतून पाहत होते. पुरी यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवासही तेवढाच रंजक आहे. अमरीश यांचा १२ जानेवारी रोजी स्मृतिदिन आहे. ते एलआयसीमध्ये अधिकारी होते. 'एलआयसी अधिकारी ते अभिनेता' हा त्यांच्या प्रवासाविषयी…
पंजाबमधील नवांशहर येथे जन्मलेले अमरीश पुरी 22 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी नायकाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. निर्मात्याने त्यांचा चेहरा नायकासाठी याेग्य नसल्याचे सांगत त्यांना नकार दिला होता. यानंतर पुरी छोट्या थिएटरकडे वळले. इब्राहिम अल्काझी यांनी 1961 मध्ये पुरी यांना रंगभूमीवर आणले. अमरीश मुंबईतील एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम करत होते आणि थिएटरमध्येही काम करत होते. काही दिवसांनंतर ते दिग्गज नाट्य कलाकार सत्यदेव दुबे यांचे सहाय्यक बनले. अमरीश पुरी नेहमी दुबे यांना गुरू मानत.
जेव्हा चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या, तेव्हा पुरी यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळातील सुमारे सरकारी नोकरी सोडली. त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ते 'अ' दर्जाचे अधिकारी झाले होते. खरतर पुरी यांना थिएटरमध्ये काम मिळाले तेव्हाच नोकरी सोडायची होती. पण सत्यदेव दुबे यांनी त्यांना सांगितले होते की, जोपर्यंत चित्रपटांमध्ये चांगल्या भूमिका मिळत नाहीत तोपर्यंत ही नोकरी सोडू नको. अखेर एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान दिग्दर्शक सुखदेवने पुरींना पाहिले. आणि 'रेश्मा और शेरा' (1971) या चित्रपटात काम दिले. यात पुरी यांनी ग्रामीण मुस्लिम मुलाचे काम केले आहे. तेव्हा अमरिश पुरी ३९ वर्षांचे होते.
अमरीश पुरी यांनी सत्तरच्या दशकात अनेक चांगले चित्रपट केले. ऐंशीच्या दशकात बाॅलीवूडमध्ये त्यांची ओळख निर्माण होऊ लागली. 1980 मध्ये 'हम पांच' या चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये संजीव कुमार, मिथुन चक्रवर्ती, नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, राज बब्बर यांची प्रमुख भूमिका हाेती. यामध्ये पुरी यांनी निर्दयी जमीनदार ठाकूर वीर प्रताप सिंह यांची भूमिका साकारली होती. सर्वांनी त्यांची दखल खलनायक म्हणून घेतली. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या 'विधाता' (1982) मुळे ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. त्यानंतर पुढच्या वर्षी घई यांच्या 'हिरो'नंतर पुरी यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. इथून पुढ अस झालकी अमरीश पुरी यांना मोठ्या चित्रपटात खलनायकाच्या भूमीकेत घेतल्याशिवाय मोठे चित्रपट झालेच नाहीत.