पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्यलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानची धुवाँधार फलंदाजी क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळाली. त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आर्यलंड विरुद्धच्या सामना अफगाणिस्तानने २७ धावांनी जिंकला. पाच सामन्यांची मालिकेत बरोबरीही साधली. मागील तीन टी-२० सामन्यात एकही बळी न घेतलेल्या राशिदने या सामन्यात दोन बळीही घेतले.
आर्यलंड विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना ११ षटकांचा करण्यात आला. नजीबुल्लाह जादरानने २४ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. फिरकीपटू राशिद खानची गोलंदाजी ही अफगाणिस्तानसाठी नेहमीच जमेचे बाजू असते. मात्र आर्यलंड विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात त्याने १० चेंडूत ३ षटकार आणि १ चौकार फटकावत ३१ धावांची धुवाँधार खेळी केली. नजीबुल्लाह आणि रशीद यांच्या खेळीमुळे अफगाणिस्तान ११ षटकांमध्ये अफगाणिस्तानने ६ गडी गमावत १३२ धावा केल्या.
१३२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आर्यलंडचा संघ मैदान उतरला. राशीद खानच्या फिरकीने आर्यलंडला जखडून ठेवले. त्याने ३ षटकांमध्ये २१ धावा देत २ बळी घेतले. तर फरीद अहमद मलिक याने ३ बळी घेतले. अफगाणिस्तान गोलंदाजाने अचूक मारा करत आर्यलंडचा डाव १०५ धावांमध्येच गुंडाळला. या विजयामुळे पाच सामन्यांची टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे. या मालिकेतील पाचवा टी-२० सामना १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
मागील तीन टी-२० सामन्यात एकही बळी न घेतलेल्या राशिद खानच्या फाॅर्मची अफगाणिस्तान संघाला चिंता हाेती. मात्र चौथ्या टी-२० सामन्यात त्याने अष्टपैलू कामगिरी करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. गोलंदाजीसह फलंदाजीतही कमाल करत त्याने आशिया चषक स्पर्धेपूर्वी सर्व प्रतिस्पर्धी संघांना अलर्ट केले आहे. आशिया कप स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. आता राशीद खान पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आल्याने सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे असणार आहे.
हेही वाचा :