

पुढारी ऑनलाईन डेस्क : २६ जानेवारी रोजी संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो. भारताच्या इतिहासात या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी एका भारतीय संघातील फलंदाजाने त्याच्या बॅटने मोठी खेळी साकारली होती. प्रजासत्ताक दिनी भारताच्या केवळ एकाच क्रिकेटपटूला शतक झळकावता आले आहे. ही खेळी इतर कोणीही नसून माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) साकरली आहे.
भारतीय संघाने २६ जानेवारीला अनेक सामने खेळले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनीही आपली ताकद दाखवली आहे. ९० धावांपर्यंत मजल मारणारे तीन फलंदाज असून तर विराट कोहली याने एकमेव शतक फटकावले आहे. सचिन तेंडुलकर, नवज्योतसिंग सिद्धू आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी ९० धावांचा टप्पा ओलांडला पण १०० धावांचा टप्पा फक्त कोहलीलाच पूर्ण करता आला आहे.
२६ जानेवारी अर्थात भारताच्या प्रजासत्ताक दिनी टीम इंडियाच्या फलंदाजांनी खेळलेली सर्वात मोठी खेळी कोहलीच्या (Virat Kohli) नावावर नोंदवली गेली आहे. २०१२ मध्ये अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने शतक झळकावले होते. २१३ चेंडूत ११ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ११६ धावांची खेळी केल्यानंतर तो बाद झाला. या सामन्यात भारताला 298 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
यानंतर सर्वात मोठ्या खेळीचा विक्रम नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्या नावावर आहे. त्यांनी ९९ धावांची खेळी झाली. १९९४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बंगळूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी ही खेळी खेळली होती. २२८ चेंडूंचा सामना करत सिद्धू यांनी ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ही खेळी खेळली.
सचिन तेंडूलकरचे (sachin tendulkar) नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. २६ जानेवारी रोजी त्याने ९६ धावांची सर्वात मोठी इनिंग खेळली होती. ९० धावांच्या नाबाद खेळीसह विराटने यादीत चौथ्या स्थानावरही कब्जा केला आहे. यानंतर २०१० मध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खेळलेली ८९ धावांच्या खेळीचा क्रमांक लागतो.