![जीव माझा गुंतला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F12%2Famhi-kolhapuri.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेने ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. मालिकेमधील अंतरा आणि मल्हारची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली आहे. या दोघांच्या सुख–दु:खात, त्यांच्या अडचणींमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली. अंतरा आणि मल्हार सोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशीर्वाद देखील दिले. आता मालिकेने ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही.
मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला. केक कट केला, सेल्फी देखील काढला. खरंतर नात्यातं प्रेम आणि विश्वास असेल तर कुठलही संकट सहज पार पाडता येतं यावर अंतराने विश्वास ठेवत अनेक अडचणीवर मात केली.
आपल्याच घरची, आपल्याच माणसांची वाटणारी, नात्यांमधली आपुलकी जपणाऱ्या आपल्या आवडत्या मालिकेने आता ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला आणि यानंतर ही कथा अधिकच उत्कंठावर्धक वळणावर पोहोचणार आहे. मालिकेत नुकतीच तुषार देसाई या नव्या पात्राची एंट्री झाली आहे. देवदत्त नागे तुषार देसाईची भूमिका साकारत आहे. मल्हार आणि अंतरामध्ये आता तिसरी व्यक्ती आली आहे त्याच्या येण्याने मालिकेत आता काय घडणार? मल्हार अंतराच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरेल.
दरम्यान, अंतरा आणि मल्हारने कोल्हापुरातील रंकाळ्याला भेट दिली. यावेळी दोघांनी फोटोही काढले. हे फोटोज तुम्ही पाहू शकता.