राज ठाकरेंचं वक्तव्य चुकीचं; त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे छत्रपती | पुढारी

राज ठाकरेंचं वक्तव्य चुकीचं; त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाईन डेस्क : “राज यांचं वक्तव्य इतिहासाला धरून नाही. राज ठाकरेंनी अभ्यास करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी बांधली, हे पूर्णपणे चुकीचं आहे. इतिहास ज्यावळी आपण मांडतो, त्यावेळी त्यातील १०० टक्के माहीत असेल तरच आपण बोललं पाहिजे. नाही तर त्याला हातसुद्धा लावू नये. मी इतकंच सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी बांधलेली नाही”, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले.

संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल आजच्या दिवशी संपत आहे. त्यानिमित्ताने ते माध्यम प्रतिनिधी बोलत होते. ते म्हणाले, “महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा समाधीजवळ गेले. त्यांनी पूजा केली. त्यामुळे समाधी कुणी बांधली यांचं श्रेय कुणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचं आणि सर्व महापुरुषांचं आहे. त्यामुळे बेकारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न महाराष्ट्रात आहे, त्यावर लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. यावर आपण बोललं पाहिजे. त्याच त्याच विषयांवर किती बोलायचं, मला त्यात पडायचं नाही”, असेही मत संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले.

कार्यकाल संपल्यामुळे पुढे राजकीय प्रवास कसा असेल, या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “राजकारण मला लागू नव्हतं. पण इथून पुढे राजकारणात उतरायचं आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मी रमतो. दोन्हीकडे माझा संपर्क वाढलेला आहे. त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही डोळ्यांसमोर ठेवून राजकारणात सक्रिय होणार आहे”, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले.

पहा व्हिडिओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

Back to top button