भारत- चीन दरम्यान पाच कलमी शांतता फॉर्म्युला; सीमेवरील तणाव कमी करण्यावर सहमती
मॉस्को (रशिया) : पुढारी ऑनलाईन
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात २ तासांहून अधिक वेळ द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पूर्व लडाखमधील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान पाच कलमी योजनेवर सहमती दर्शवण्यात आली. यात सीमेसंदर्भातील सर्व करार आणि प्रोटोकॉलचे पालन करणे, शांतता राखणे आणि कोणतीही कारवाई टाळणे आदी मुद्यांच्या समावेश आहे.
शांघाय कोऑपरेशन आर्गनायझेशन (एससीओ) बैठकीदरम्यान मास्कोत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांत विविध मुद्यांवर द्निपक्षीय चर्चा झाली. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या संख्येने चिनी सैनिक तैनातीवर भारताकडून सवाल उपस्थित करण्यात आले. चीनचा हा प्रयत्न १९९३ आणि १९६६ च्या कराराचे उल्लंघन आहे. भारताच्या या सवालावर चीनच्या बाजूकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गेल्या ३ महिन्यांपासून अधिक काळ पूर्व लडाखमध्ये भारत-चीन दरम्यान तणावस्थिती आहे. जून महिन्यात दोन्ही देशांच्या सैनिकांत झटापट झाली होती. यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. चीनचेही सैनिक मारले गेले होते. या घटनेनंतर सीमेवर तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान मंत्री स्तरावर द्विपक्षीय चर्चा झाली आहे. मात्र, सीमावादावर अद्याप ठोस काही निर्णय झालेला नाही.
वाचा अन्य काही महत्वाच्या बातम्या…
‘सिरम’च्या भारतातील चाचण्यांनाही ब्रेक !