पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी बहुमत मिळण्याचा दावा केल्यामुळे राजकीय पातळीवर चित्र धुसर झाले आहे. विधानसभेत कोणत्या पक्षाला (गोवा विधानसभा निवडणूक) बहुमत मिळणार की 2017 ची पुनरावृत्ती ( कोणालाच बहुमत नसल्याची अवस्था) होणार याविषयी दावे-प्रतिदावे ऐकण्यास मिळत आहेत. त्यातच राजकीय नेते विविध वक्तव्ये करून यात भर घालत आहेत.
काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आपण आहे, असे माजी मंत्री मायकल लोबो यांनी सांगून उत्कंठा वाढवली असताना, पक्षाने न मागताच आपल्याला मुख्यमंत्री पद दिले होते याची आठवण करून देण्यास विरोधी पक्षनेते दिगंबर कामत विसरले नाहीत. मगोप तृणमूल काँग्रेस युतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आपले नाव जाहीर व्हावे, असे आमदार सुदिन ढवळीकर यांना वाटत होते. मात्र शेवटपर्यंत तृणमूल काँग्रेसने त्यांना दाद दिली नाही. ढवळीकर यांनीही आपला विरोध भाजपला नव्हे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आहे हे स्पष्ट करताना डॉ. सावंत (गोवा विधानसभा निवडणूक) यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा नाही. विश्वजित राणे यांच्या नावाचा विचार भाजपने करावा, असेही सुचवले.
आम आदमी पक्षाने अॅड. अमित पालेकर यांचे नाव मुख्यमंत्री (गोवा विधानसभा निवडणूक) पदासाठी घोषित केले आहे. आम आदमी पक्षाने भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्यास उत्सुकता दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचे काय होणार हे त्यांनी स्पष्ट करणे गरजेचे बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची आघाडी आहे; पण आघाडीचा नेताच ठरलेला नाही.
रिव्होल्युशनरी गोवन्सही शर्यतीत आहेत. अपक्षांचाही बोलबाला सांगे, मांद्रे मतदारसंघात (गोवा विधानसभा निवडणूक) आहे. त्यामुळे सत्तेच्या सारीपाटात कोणाच्या सोंगट्या साथ देतील याविषयी अस्पष्टता कायम आहे. एका अर्थाने ही राजकीय कोंडीच आहे. 2017 मध्ये नेता निवडीत घोळ घातल्याने काँग्रेसने सत्ता स्थापन करण्याची संधी गमावली होती. त्यामुळे पाचच मिनिटात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू, असे काँग्रेस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते शक्य होईल असे दिसत नाही. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले तर डॉ. सावंत यांना मुख्यमंत्री पदापर्यंत विनासायास वाटचाल करता येईल. तीन-चार आमदार कमी पडले तर मात्र त्यांची नेतृत्व कायम ठेवण्यात कसोटी लागेल.
भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवलेला नाही, केंद्रीय संसदीय मंडळाने तसा निर्णयच घेतलेला नाही, असे सांगत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वतःला मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणण्याचा प्रयत्न केला. चारच दिवसात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार केंद्रीय संसदीय मंडळ ठरवेल, असे शक्य तितक्या नम्र आवाजात सांगताना त्यांची देहबोली सर्व काही स्पष्ट करत होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, भाजपच्या तंबूत घबराट आहे. ते उसने अवसान आणून बहुमत मिळवू असे सांगत असले तरी सत्ता हातातून निसटणार याची कल्पना त्यांना आली आहे. त्यासाठी मतमोजणीनंतरच्या तडजोडींच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. काँग्रेस आघाडी 26 जागा जिंकून सरकार स्थापन करणार आहे. सत्तेत असताना केलेले घोटाळे बाहेर येतील म्हणून भाजपवाले आतापासूनच घाबरू लागले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले, की काँग्रेसने 26 जागा जिंकण्याचा दावा केला त्या मतदारसंघाची निदान नावे तरी जाहीर करावीत. काँग्रेसमध्ये निर्नायकी अवस्था झाली आहे. भाजपद्वेषापोटी चार-दोन नेते एकत्र येऊन आम्हीच खरे काँग्रेसवाले म्हणू लागले आहेत. त्यांना जनतेने सपशेल नाकारले आहे. 10 मार्चला काँग्रेसला त्यांची जागा जनताच दाखवून देणार आहे. त्यांनी सत्तेत येण्याची स्वप्ने पाहण्यात मग्न राहू नये.
हेही वाचलं का?