Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये अडकले ३०० गोमंतकीय विद्यार्थी, गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न | पुढारी

Russia-Ukraine war : युक्रेनमध्ये अडकले ३०० गोमंतकीय विद्यार्थी, गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. उच्च शिक्षणासाठी गेलेले 15 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यात सुमारे 300 गोमंतकीयांचाही समावेश आहे. त्यांना एअर लिफ्ट करणारे एअर इंडियाचे विमान बुधवारी युक्रेनमधून निघणार होते. मात्र, त्यापूर्वीच विमानतळ बंद करण्यात आले. केंद्र सरकारच्या मदतीने तिथे अडकलेल्या गोमांतकीयांना सुखरूप गोव्यात आणण्यासाठी अनिवासी भारतीय आयुक्तालयाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

युक्रेनमध्ये 15 हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती, अनिवासी आयुक्ताचे संचालक आणि मोहिमेचे नोडल अधिकारी अ‍ॅन्थनी डिसुझा यांनी दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये गोमंतकीय विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आहे, याची कोणतीही माहिती अनिवासी आयुक्तालयाकडे उपलब्ध नाही. मात्र, तरीही हा आकडा 300 वर जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
या संदर्भात अनिवासी भारतीय आयुक्त अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांना विचारले असता, राज्यातील चार कुटुंबांनी आपल्याशी संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांना गोव्यात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाला आम्ही मेलद्वारे पत्र पाठविले आहे. त्यांना आणण्यासाठी विमान सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र, अखेरच्या क्षणी विमानतळ बंद करण्याचा निर्णय युक्रेन सरकारकडून घेण्यात आला. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेले अँथनी डिसुझा हे सदर कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अ‍ॅड. सावईकर यांनी दिली.

युक्रेनमध्ये अडकलेल्यांना परत आणा : तन्वीर खतीब

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारतातील अनेकजण युक्रेनध्ये अकडले आहेत. त्यात गोमंतकीय नागरिकांचाही समावेश आहे. भाजप सरकारने केवळ पत्रकार परिषदा न घेता, त्यांना आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते तन्वीर खतीब यांनी केली आहे. खतीब म्हणाले की, युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध होणार, असे चित्र आठवड्यापूर्वीच दिसत होते. तेव्हापासून केंद्र सरकारने भारतीयांना आणण्यासाठी पावले उचलली नाहीत. आता युद्ध सुरू झाल्याने भारतीय तसेच गोमंतकीय नागरिक त्याठिकाणी अडकून पडले आहेत. भाजप सरकार आता पत्रकार परिषदा घेऊन माहिती देत असले तरी ते योग्य नाही, सेही त्यांनी सांगितले.

हेही वाचलत का ?

Back to top button