सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दोन दिवसांपूर्वीच बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यावर अविश्वास आणावे, असे थेट आव्हान दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ते आव्हान स्वीकारले आहे.
श्रीशैल नरोळे यांच्या राजीनाम्यामुळे बाजार समितीचे राजकारण आता चांगलेच तापले आहे.
सभापती देशमुख यांच्याकडे एक वर्षासाठी सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
परंतु दोन वर्षे झाले तरी ते राजीनामा देत नाहीत याची सल काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाली.
त्यामुळे त्यांनी देशमुख यांना बाजार समितीच्या सभापती पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली असता त्यांनी दिला नाही.
त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्याकडे उपसभापती नरोळे यांनी राजीनामा दिला आहे.
त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांची बंद खोलीत चर्चा झाली आहे.
देशमुख यांनी स्वतःहून सभापती पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर त्यांच्यावर अविश्वास आणण्याचे नियोजन काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे आता बाजार समितीचे राजकारण चांगलेच तापले आहे.
पाहा व्हिडिओ : येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध – शीतलकुमार रवंदळे