सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला पुण्याप्रमाणेच शिथिलता देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करून याचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात कोरोना नियंत्रणात आहे. व्यापारी व दुकानदार कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. सायंकाळी ४ नंतर शहरातील दुकाने बंद असतात. सोलापूर शहराचा जुलै महिन्यातील कोरोना पॉझिटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. ऑक्सिजन बेडची टक्केवारी सहा टक्क्यांवर आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्यकता आहे.
उपमुख्यमंत्री अजितपवार आणि जिल्हाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली होती. त्यामुळे जून महिन्यात सर्वच बाजारपेठ सुरू झाली होती. आता मात्र, स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नसल्यामुळे ४ नंतर बाजारपेठ बंद असते.
त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी आणि व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे निवेदन देऊन लॉकडाऊन शिथिल करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरात कामगार, यंत्रमाग उद्योग व व्यापारी वर्ग असल्याने प्रशासनाकडून तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करून त्यांनी पाठपुरावा करून सकारात्मक प्रतिसाद मिळविला.
दत्तात्रय भरणे यांनी याबाबत सांगितले की, सोलापूर शहराला शिथिलता देण्याचा निर्णय आजच होणे अपेक्षित होते. परंतु, मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्याने या प्रस्तावावर सही होऊ शकलेली नाही. येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार येईल.
हेही वाचलंत का?