Diljit Dosanjh slams pro-Khalistan protesters
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. कॅनडातील कॅलगरी येथे आयोजित एका कार्यक्रमात रंगीबेरंगी रोषणाई आणि पारंपारिक वेशभूषेत दिलजीतने आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. मात्र, याच दरम्यान काही खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी खलिस्तानी झेंडे फडकवणाऱ्यांना दिलजीतने स्टेजवरूनच सडेतोड उत्तर दिले.
कॅलगरीमध्ये 'ऑरा टूर' (Aura Tour) अंतर्गत गुरुवारी (30 एप्रिल) कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झघला आहे. यामध्ये दिसून आले की, दिलजीतचा कार्यक्रम सुरू असताना काही लोकांनी खलिस्तानी झेंडे फडकवण्यास सुरुवात केली. हे पाहताच दिलजीतने गाणे मध्येच थांबवले व त्या लोकांकडे बोट दाखवून त्यांना सुनावले. माईक हातात घेऊन त्याने त्यांना हा उपद्रव थांबवण्यास आणि "हे सगळं बाहेर जाऊन करा" असे ठणकावून सांगितले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कॉन्सर्टमध्येही अशाच प्रकारे खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातल्याची आठवण त्याने करून दिली.
स्टेजवरून प्रेक्षकांना संबोधित करताना दिलजीत म्हणाला, “माझे काम समाजसेवा करणे नाही, पण मी ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर जातो, तिथे मी नेहमी पंजाबबद्दल बोलतो. आपण नेहमी म्हणतो की नॅशनल मीडिया पंजाबबद्दल बोलत नाही. मग मी त्या चॅनेलवर (सोनी टीव्हीवरील KBC) फक्त पंजाबसाठी गेलो होतो. मी तिथे पंजाबचे प्रश्न मांडले. जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा मी माझ्या राज्यासाठी सढळ हाताने मदत केली आहे.”
टीकाकारांना उत्तर देताना दिलजीत पुढे म्हणाला, “मी जिमी फॉलनच्या शोमध्ये देखील पंजाब आणि 'गुरु नानक जहाज' घटनेबद्दल बोलण्यासाठी गेलो होतो. मी तिथे कोणत्याही चित्रपट किंवा गाण्याच्या प्रमोशनसाठी गेलो नव्हतो. नॅशनल आणि इंटरनॅशनल मीडियाने पंजाबच्या प्रश्नांवर चर्चा करावी, हाच माझा उद्देश होता. जर तुम्हाला अजूनही मी टीव्हीवर कोणासमोर बसलो होतो यावरून अडचण असेल, तर तुम्हाला हवे तितके झेंडे फडकवत राहा, मला फरक पडत नाही,” असेही त्याने सुनावले.
ऑक्टोबर २०२५ मध्ये दिलजीत KBC च्या १७ व्या सीझनमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. अमिताभ यांनी त्याचे 'पंजाब दा पुत्तर' (पंजाबचा मुलगा) म्हणून कौतुक केले होते. मात्र, हा भाग प्रसारित झाल्यानंतर 'सिख फॉर जस्टिस' (SFJ) या बंदी घातलेल्या संघटनेने दिलजीतला धमक्या देण्यास सुरुवात केली. या वादाचे मुख्य कारण म्हणजे १९८४ च्या शिख दंगलींशी अमिताभ बच्चन यांचे नाव जोडले जाणे. कट्टरपंथी गटांचा आरोप आहे की, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बच्चन यांनी शिख समुदायाविरुद्ध हिंसाचार भडकवणारी विधाने केली होती. अमिताभ बच्चन यांनी हे आरोप नेहमीच फेटाळून लावले आहेत, तरीही काही संघटनांचा विरोध कायम आहे.
SFJ ने यापूर्वी ऑस्ट्रेलियातील दिलजीतच्या कॉन्सर्टमध्येही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ब्रिस्बेन येथील कार्यक्रमात दिलजीत म्हणाला होता, “मी नेहमी प्रेमाची भाषा बोलेन. माझ्यासाठी ही पृथ्वी एक आहे. माझे गुरु म्हणतात 'इक ओंकार' (ईश्वर एक आहे). माझा जन्म या मातीत झाला आणि एक दिवस मी याच मातीत जाणार आहे. त्यामुळे कोणी माझ्यावर जळले किंवा मला ट्रोल केले, तरी माझ्या मनात सर्वांसाठी प्रेमच असेल.”
विशेष म्हणजे, ही घटना घडण्याच्या एक दिवस आधीच कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिसने (CSIS) आपल्या देशातील खलिस्तानी धोक्याची कबुली दिली आहे. कॅनडाच्या संसदेत सादर करण्यात आलेल्या 'CSIS रिपोर्ट २०२५' मध्ये म्हटले आहे की: हे गट कॅनेडियन नागरिकांशी जोडलेले असून, तेथील संस्थांचा वापर करून निधी गोळा करतात. हा निधी नंतर हिंसक कारवायांकडे वळवला जातो.
गेल्या काही वर्षांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कॅनडा सरकार खलिस्तानी घटकांविरुद्ध मवाळ धोरण अवलंबत असल्याचा आरोप भारताने वारंवार केला आहे. अशा वातावरणात दिलजीतने भर कार्यक्रमात घेतलेली ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.